शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:50 IST2025-06-18T19:49:25+5:302025-06-18T19:50:47+5:30
महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर
छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) व किरण ऊर्फ बाळू जगन्नाथ दहीहंडे (३०) या काका-पुतण्याचा वीजप्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता चिकलठाणा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी चौकशी करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार वाजता महावितरणचे मुख्य अभियंता, संबंधित लाईनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचारी यांच्यावर, व्हिडीओ पाठवूनही तसेच कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून महावितरणकडे लोंबकळणाऱ्या या तारा हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी कचरू व किरण दहीहंडे दोघेही पेरणीच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेले होते. १५ मे पासून वीजप्रवाह नसलेल्या तारांमध्ये सोमवारीदेखील वीजप्रवाह नसावा, असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अचानक वीजप्रवाह उतरलेला होता. तारांना स्पर्श करताच दोघेही गंभीररीत्या भाजून शेतातच गतप्राण झाले.
महावितरणच्या बेजबाबदारपणाचा घटनाक्रम
-कचरू दहीहंडे यांच्या कुटुंबाची चिकलठाण्याच्या गट क्रमांक ६६८ मध्ये साडेपाच एकर शेती आहे. त्यांच्या शेजारील हरीशचंद्र त्रिभुवन यांची शेतजमीन किरण यांनी बटाईने घेतली हाेती. त्यांच्या शेतातून विमानतळासाठी १५ वर्षांपूर्वी अतिउच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे.
-त्याखालून थ्रीफेज लाईन गेली असून, १९ मे रोजी वादळात त्यावर झाड कोसळून विजेचे खांब कोसळून तारा लोंबकळल्या होत्या.
-दहीहंडे कुटुंबाने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही बाब कळवली. व्हॉट्सॲपवर व्हिडीओदेखील पाठवले.
- तीन दिवसांनी अधिकारी, लाईनमनने भेट देऊन वादळात पडलेला विजेचा खांब काही अंतरावर उभा केला. मात्र, अतिउच्च दाबाचे खांब दुरुस्त केले नाहीत. त्यानंतर वारंवार दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना बेजबाबदार महावितरणने प्रतिसाद दिला नाही.
एक कलम टाळले
-सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांच्या मृत्यू प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी बीएनएस १०५ (सदोष मनुष्यवध),१२५ (अ), १२५ (ब) (इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) आणि ३(५) (समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती) या कलमांतर्गत सहाजणांवर गुन्हा दाखल केला.
-एमआयडीसी सिडको पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात १२५ (अ, ब) हे कलम टाळून बीएनएस १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
रात्री उशिरापर्यंत पाच अधिकारी, कर्मचारी ठाण्यात
दहीहंडे कुटुंबावर ओढवलेल्या संकटानंतर ग्रामस्थ, नातेवाइकांनी महावितरणविरोधात मंगळवारीदेखील संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दुपारीच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती.
महावितरणचे मुख्य अभियंता कोण आहेत?
- मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे सध्या वैद्यकीय रजेवर.
- सध्या प्रभारी मुख्य अभियंता महेश पवार हे आहेत.
- अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी काही दिवस प्रभारी मुख्य अभियंतापदाचा पदभार सांभाळला.