वैजापूर : १९९९ पासून वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिराज्य होते. आर. एम. वाणी यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली होती; परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि या निवडणुकीत त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. परिणामी, शिवसेनेवर आता उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
वैजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. १९९९ ते २००९ पर्यंत वाणी यांनी सलग तीनवेळा येथे भगवा फडकवला. गेल्या वेळी मात्र त्यांचा पराभव झाला होता, तर काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे वाणी यांनी जाहीर केले होते. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून लोकसभा निवडणुकीत सेनेला येथून चांगले मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे शिवसेना ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, हे निश्चित आहे.दरम्यान, वाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सेनेकडे दुसरा प्रभावी असा चेहरा नाही. त्यामुळे सेना नेतृत्व विरोधकांना चीत करेल, अशा उमेदवाराच्या शोधार्थ आहे, असे असले तरी मतदारसंघातील शिवसैनिक गेल्या तीन दिवसांपासून वाणी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करीत आहेत, दुसरीकडे, या निवडणुकीत वाणी यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी तालुक्यातील शिवसेनेचा एक गट मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा ऐकायला येत आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना माजी आमदार वाणी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवावी यासाठी तालुक्यातील शिवसैनिक आग्रही आहेत. मात्र, निवडणूक न लढवण्याचा, आपण निर्णय घेतला असून, त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे वैजापूर मतदारसंघात शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.