‘आयटी कनेक्टिव्हिटी’ला बूस्ट! छ. संभाजीनगरहून बंगळुरू विमान आता आठवड्यातून चार दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:20 IST2026-03-20T15:01:33+5:302026-03-20T15:20:02+5:30
छत्रपती ३१ मार्चपासून संभाजीनगर ते बंगळुरू उड्डाणांमध्ये वाढ; सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान झेपावणार

‘आयटी कनेक्टिव्हिटी’ला बूस्ट! छ. संभाजीनगरहून बंगळुरू विमान आता आठवड्यातून चार दिवस
छत्रपती संभाजीनगर : शहरातून आयटी राजधानी बंगळुरूकडे जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने ''समर शेड्यूल २०२६'' अंतर्गत छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हील एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.
सध्या ही विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे. ३१ मार्चपासून लागू होणाऱ्या या नव्या वेळापत्रकानुसार सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवशी या विमानाचे नियमित उड्डाणे होणार आहेत. दुपारनंतरची वेळ असल्याने व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरत आहे. विशेष म्हणजे, या वाढीव सेवेमुळे छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू यांमधील अंतर केवळ वेळेतच नव्हे, तर संधींमध्येही कमी होणार आहे. आयटी, स्टार्टअप्स आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची मानली जाते. शहरातून मोठ्या प्रमाणात बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.
उद्योग, पर्यटन, शिक्षण क्षेत्राला फायदा
या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू यांच्यातील हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत होणार असून, उद्योग, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः आयटी हब असलेल्या बंगळुरूसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी स्थानिक उद्योगांसाठीही सकारात्मक पाऊल मानले जात आहे. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या प्रगतीसाठी वाढलेले उड्डाण महत्त्वाचा टप्पा ठरेल.