छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगोने मुंबईच्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळवले, नंतर विमानच रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:00 IST2025-12-03T11:59:26+5:302025-12-03T12:00:30+5:30
दिल्लीचे विमानही २ तास उशिरा, इंडिगोचे रडगाणे सुरूच

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगोने मुंबईच्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळवले, नंतर विमानच रद्द
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे विमान कधी अचानक रद्द होणे, तर उशिराने येण्याचा प्रकार सुरूच आहे. काही दिवसांपासून दिल्ली, मुंबईच्या विमानास वारंवार विलंब होत असल्यानेही प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दिल्लीच्या विमानाला मंगळवारी दोन तास विलंब झाला, तर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळविल्यानंतर हे विमानच रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दिल्लीचे विमान मंगळवारी सायंकाळी ०६:४५ ऐवजी रात्री ०८:३२ वाजता आले. त्यामुळे सायंकाळी ०७:४५ ऐवजी ०९:३० वाजेच्या सुमारास या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले. त्याबरोबर रात्री ०८:४५ वाजता येऊन रात्री ०९:१५ वाजता उड्डाण घेणारे विमान दोन तास उशिराने रात्री ११:१५ वाजता उड्डाण करणार असल्याचा संदेश प्रवाशांना देण्यात आला; परंतु नंतर हे विमान रद्द करण्यात आले. काही प्रवाशांंना रस्ते मार्गाने जाण्यासाठी सुविधा करून देण्यात आली, तर काहींसाठी सकाळ वेळेतील विमानाची सोय करण्यात आली. याबाबत स्थानिक इंडिगोप्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
वेळापत्रक पाळण्याची जबाबदारी हवी
इंडिगोचे विमान वारंवार उशिराने येत आहे. विमानसेवेच्या वेळांचे काटेकोरपणे पालन व्हावे. इंडिगोचे अन्य ठिकाणचे विमान शहरात येते. तिकडे उशीर झाला की, इकडे उशीर होतो. यामुळे प्रवाशांना रेल्वे, रस्ते मार्गाने मुंबईला जावे लागत आहे.
-जसवंतसिंह, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)
कोणत्या दिवशी रद्द?
- १ नोव्हेंबर रोजी रात्रीचे मुंबई विमान.
- ३ नोव्हेंबर रोजी सकाळचे मुंबई विमान.
- ७ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि दिल्लीचे विमान.
- ११ नोव्हेंबर रोजी गोवा विमान.
- २७ नोव्हेंबर रोजी सकाळचे मुंबई विमान.
कोणत्या दिवशी विमान उशिरा?
- २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली सव्वातास.
- २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली २ तास.
-२५ नोव्हेंबर रोजी दिल्ली सव्वातास.
- २६ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानास ५ तास विलंब. दिल्ली विमान एक तास.
- २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली विमान दीड तास.
- २८ नोव्हेंबर रोजी मुंबई, दिल्ली विमानाला दीड तास.
- ३० नोव्हेंबरला मुंबई २ तास.
- १ डिसेंबर रोजी मुंबई एक तास.
१६७ प्रवाशांचा मुंबईत, १६० प्रवाशांचा शहरात खोळंबा
इंडिगोच्या विमानाने मुंबईहून १६७ प्रवासी शहरात येणार होते, तर शहरातून १६० प्रवासी मुंबईला जाणार होते. विमानाला विलंब झाल्याने दोन्ही ठिकाणच्या प्रवाशांचा खोळंबा झाला.
४ तास मुंबई विमानतळावर ताटकळत
सायंकाळी ०७:३५ वाजता उड्डाण घेणारे विमान रात्री ११:०० वाजेपर्यंत मुंबईहून निघालेले नव्हते. जवळपास चार तास प्रवाशांना मुंबई विमानतळावर ताटकळावे लागले.
आधी अर्ध्या-अर्ध्या तासाने उशीर, नंतर रद्दच
मुंबईहून सायंकाळी साडेसात वाजता प्रस्थान होते. अर्ध्या-अर्ध्या तासाने उशीर करीत ११:०० वाजेपर्यंत ‘बाेर्डिंग’ही झालेले नव्हते. त्यानंतर हे विमान रद्द झाले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. परदेशांतून आलेल्या नागरिकांचे अधिक हाल झाले.
-सुधीर बोरगावकर, प्रवाशाचे नातेवाईक