५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:25 IST2025-06-21T12:24:59+5:302025-06-21T12:25:38+5:30
''आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.''

५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी बसस्टॉप परिसरात गेल्या ५५ वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. मनपाच्या पथकाने १०० मीटरपेक्षा अधिक आत घुसून दुकाने, व्यावसायिक जागा जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले असून, त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या.
या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसीची हद्द होती, तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे आणि तत्कालीन उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे प्लॉट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सत्ता परिवर्तनामुळे हा निर्णय अंमलात आला नाही. यानंतर देखील स्थानिक नागरिकांनी सिडकोकडे पैसे भरून नियमितपणे जागा मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि शुक्रवारी अचानकपणे मनपाने अतिक्रमणाच्या नावाखाली ही कारवाई केली.
माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे आणि भाऊसाहेब जगताप यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप केला. आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.
विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या कारवाईत भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. सत्तेचा वापर करून गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे. भाजप आमदारांनी मुकुंदवाडीतील स्थानिक लोकांना त्यांच्या व्यवसायातून हुसकावून लावले, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला.
या अन्यायाच्या विरोधात आता व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. शनिवारी (२१ जून) मुकुंदवाडी परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटना यांनी अतिक्रमणविरोधी अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.
अंगावर रॉकेल घेत अतिक्रमणाला विरोध
अतिक्रमणविरोधी पथकाने संजयनगर गल्ली नं.१ मध्ये राजेश पवार यांचे घर पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा राजेशने पथकाला अडविण्याचे खूप प्रयत्न केले; पण पथकातील कर्मचारी ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते.
माझे अख्खे कुटुंब उघड्यावर आणून तुम्हाला काय साध्य करायचे आहे. नोटीस दाखवा, मगच घराला हात लावा. २० वर्षांपासून आम्ही कर भरतो. आमचे घर आताच कसे अतिक्रमणात आले, असे प्रश्न करीत शेवटी राजेशने रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोट्यवधींचे नुकसान
शुक्रवारी २२९ अतिक्रमणे पाडण्यात आली. यातील बहुतांश दुकानांमधील सामानही व्यापाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज या भागातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.
दुचाकी वाहने जप्त
मुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियम येथे नेल्या. त्यानंतर त्यांचे शेड जमीनदोस्त केले.
बेघर करण्याच्या आदेशाने मन हेलावले
या घरात आम्ही उद्याचे स्वप्न बघितले होते, पण आता आमच्या डोक्यावरचे छप्पर हिरावले जातेय, या शब्दांत संजयनगर गल्ली नंबर १ मधील रहिवासी आकाश गतखणे यांनी मनपाच्या कारवाईविरोधात आपल्या व्यथा मांडल्या. गतखणे कुटुंब गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या परिसरात राहत असून, त्यांनी आपल्या राहत्या घरातच वॉशिंग