तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने शेतकऱ्यांचा मृत्यू; पहिली जबाबदारी टाळणाऱ्या लाइनमनला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:37 IST2025-06-19T18:37:28+5:302025-06-19T18:37:50+5:30
न्यायालयाकडून दाेन दिवस पोलिस कोठडी, आणखी कर्मचारी, अधिकारी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता

तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने शेतकऱ्यांचा मृत्यू; पहिली जबाबदारी टाळणाऱ्या लाइनमनला अटक
छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू व किरण दहीहंडे या काका-पुतण्याचा वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी चिकलठाण्यातील घटनेनंतर सर्वच स्तरांतून बेजबाबदार महावितरणवर संतप्त टीका झाली. यात एमआयडीसी सिडको पोलिसांनी या कामाची पहिली जबाबदारी असलेल्या महावितरणचा लाइनमन प्रेमचंद लालचंद चव्हाण (रा. गारखेडा) याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
साेमवारी सायंकाळी ही घटना घडली. कुटुंबासह ग्रामस्थांनी तब्बल अडीच तास दोघांच्या मृतदेहासोबत रास्ता रोको करत महावितरणवर तीव्र रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिसांनी धाव घेत महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी पहाटे महावितरणचे मुख्य अभियंत्यासह संबंधित लाइनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?
-एमआयडीसी सिडको पोलिसांनी रविवारी महावितरणच्या सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. चव्हाण त्या परिसरातील लाइनमन असल्याने सर्वप्रथम त्यास परिसरातील तारा दुरुस्तीस जबाबदार धरत अटक करण्यात आली.
-चव्हाण व्यतिरिक्त तक्रारीची दखल घेणे, त्या सोडवणे, त्या न सोडविल्यास आणखी कोणावर काय जबाबदारी येते, याचा पोलिस तपास करीत आहेत. जबाबदारी निश्चित होताच त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
कुटुंबाला निश्चित न्याय मिळेल
सदर घटनेप्रकरणी सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. कोणावर काय जबाबदारी होती, याचे विवरण घेतले जात आहे. त्यानुसार सखोल तपास करून संबंधित प्रत्येकावर कारवाई होईल. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पोलिस निश्चित न्याय मिळवून देतील.
-गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.