दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 20:00 IST2024-12-31T20:00:10+5:302024-12-31T20:00:29+5:30
पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोनही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या कामात घातलेल्या तांत्रिक घोळावर सोमवारी मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दोन तास खल घातला. परंतु, तांत्रिक चूक किती अंतरात व कुणी केली, हे समोर आलेच नाही.
आता सगळ्या तांत्रिक यंत्रणांनी रस्ता व जलवाहिनीच्या कामाची संयुक्तिक पाहणी करून चार दिवसांत अहवाल देण्याचे आदेश सोमवारच्या बैठकीत देण्यात आले. तांत्रिक पाहणीसाठी मनपा आयुक्त जी. श्रीकांत लीड करतील, असे बैठकीत ठरले. ‘लोकमत’ने जलवाहिनी व रस्त्याच्या कामातील तांत्रिक घोळाचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यावर सगळ्या यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहेत.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीखाली मंजूर जलवाहिनी टाकल्यास व त्यावरून रस्ता गेला असेल, तर भविष्यात जलवाहिनीची देखभाल करण्याविषयी निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांबाबत व याबाबतच्या तांत्रिक शक्यतांवरून बैठकीत एमजेपी आणि एनएचएआयच्या जबाबदार अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी झापले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, आ. अनुराधा चव्हाण, मजिप्राच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, अभियंता दीपक कोळी, मनोज पाठक, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले, अनिकेत कुलकर्णी, मनपा मुख्य अभियंता ए. बी. देशमुख, अभियंता किरण पाटील, जीव्हीपीआर कंपनीचे जी. मेहंदर, खलील अहमद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यान्वयन यंत्रणांनी समन्वयाने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, सात दिवसांनंतर किती अंतरात तांत्रिक अडचण आहे, हे समोर येईल.
हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले
भविष्या रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यास दुरुस्ती कशी करणार, कॅरेज-वे वरून वाहने गेल्यास काय करणार, एमजेपी, एनएचएआय या संस्थेने त्यांच्या कामाचा स्वार्थ पाहिला काय, ३५ किमी जलवाहिनी टाकली आहे. किती किमी अंतरात रस्त्याखाली जलवाहिनी दबली आहे. २० किमी अंतरात हा तांत्रिक घोळ नसल्याचा दावा अचानक का केला जात आहे, एन-केसिंग, डक्ट करणे शक्य नाही. मग उपाय काय करणार हे अद्याप स्पष्ट नाही.
जलवाहिनी योजनेच्या कामांतील महत्त्वाचे दावे असे
२०१९ मध्ये नगरोत्थानअंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला मान्यता.
२०२१-२२ मध्ये अमृत २.० योजनेत समावेश, सुधारीत मंजुरी मिळाली.
१८०८ कोटी ३९ पैकी १५८३ कोटी ३२ लाख कंत्राटदाराला दिले.
जॅकवेलचे भिंतीचे ११.९ मीटर उंचीपर्यंत, तर वर्तुळाकार भिंतीचे २२.७ मीटरपर्यंत पूर्ण.
मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे. पुलाचे काम ७५ टक्के पूर्ण.
जलाभिसरण कारंजाचे ९० टक्के, आऊटलेट चेंबर ७२ टक्के, सीएलफचे काम ९५ टके पूर्ण.
पंप, केमिकल हाऊसचे काम ७० टक्के पूर्ण.
४७ उंच जलकुंभ व ३ बैठे जलकुंभ, असे एकूण ५० जलकुंभ बांधणे सुरू आहे.
७ उंच जलकुंभ, तर २ बैठे जलकुंभांचे काम पूर्ण.
उर्वरीत जलकुंभांचे काम ९० टक्क्यांपर्यंत गेले आहे.
चाचणीनंतरच कंत्राटदाराचे बिल द्या
रस्त्याचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करताना रस्ता खोदावा लागू नये. यासाठी सगळ्या यंत्रणांनी मिळून संयुक्त तांत्रिक पाहणी करावी. चार दिवसांत त्याचा अहवाल द्यावा. मार्च २०२५ पर्यंत पहिल्या टप्प्यातील २०० दलघमी पाणी शहराला पुरवठा होईल, यासाठी प्रयत्न करा. या कामाची हायड्रॉलिक तसेच रेडिओग्राफिक चाचणी घेतल्यानंतरच ठेकेदाराेचे देयक अदा करावे.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
योजना पुढील ५० वर्षांसाठी
ही योजना आगामी ५० वर्षांसाठी तयार केली आहे. लोकांना पाणी मिळावे, पैठणकडे जाणारी, तसेच बिडकीन व चितेगाव या रस्त्यालगतच्या गावातील रहदारी सुरळीत व्हावी, यादृष्टीने उपाययोजना करा.
- संदीपान भुमरे, खासदार.