औरंगाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन करत पहाटे पाच वाजता दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्या ५० व्यापाऱ्यांवर सिटी चौकपोलिस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दुकानांना सील केले आहे.
'ब्रेक दी चैन' अंतर्गत सध्या कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरु आहे. यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी आगे. मात्र, असे असताना शहरातील सिटी चौक भागात काही दुकाने पहाटे ५ वाजेपासून व्यवसाय करत असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, यातील काही दुकाने अत्यावश्यक सेवेतील नाहीत. मागील वर्षी मुस्लिम बांधवांना रमजान ईद साजरी करता आली नव्हती. यंदा तशीच परिस्थिती आहे. काही व्यापारी ईदची संधी साधून पहाटे पाच वाजेपासून दुकाने उघडत आहेत. नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात येत आहेत. सकाळी सात ते अकरा या वेळेची संधी उचलत व्यापारी व्यवसाय करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा छुपा व्यवहार शहरात सुरू होता. आज अति झाल्याने पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.
सिटी चौक पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा ५० व्यापाऱ्यांवर आज सकाळी गुन्हे दाखल केली आहेत. यानंतर सर्व दुकानांची यादी महापालिकेकडे देण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सर्व दुकानांना पुढील आदेशापर्यंत सील करण्याची कारवाई केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.