विदेशी व अंतर्गत शक्तीचे देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र - किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 20:08 IST2020-12-24T20:03:55+5:302020-12-24T20:08:16+5:30
देशाला मजबूत करण्यासाठी भाजप आवश्यक

विदेशी व अंतर्गत शक्तीचे देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र - किरेन रिजिजू
औरंगाबाद : देश सुरक्षित व मजबूत भाजपच ठेवू शकतो. त्यामुळे देशाला भाजपचीच आवश्यकता आहे, असा दावा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) किरेन रिजिजू यांनी गुरुवारी येथे केला. तसेच काही विदेशी व अंतर्गत शक्ती देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयास धावती भेट दिली. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औरंगाबादमध्ये क्रीडा खात्यातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर मला विशेष ऊर्जा मिळते. यापूर्वी मी २०१८ साली औरंगाबादला आलो होतो, याची आठवण करून देत किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आपण कमळ फुलविण्यासाठी कसा संघर्ष केला, हे सांगितले. पहाडी भागात कमळ फुलत नसते, असे काँग्रेसवाले म्हणत असत. त्यांचे हे म्हणणे खोटे ठरविले. (टाळ्या) आज अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार आहे. ६० पैकी ५१ आमदार भाजपचे निवडून आले. मी स्वत: खासदार म्हणून निवडून आलो असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ
शिवसेनेने धोका दिला, नसता महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार असते, अशी खंत रिजिजू यांनी व्यक्त केली. मात्र, पुढच्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.