छत्रपती संभाजीनगर : वादळवारे, पाऊस आल्यानंतर वीज गायब होण्याचा ‘विक्रम’ महावितरणने नोंदविला. शहरासह परिसरामध्ये गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर वीज गुल झाली होती. वीज कशामुळे गेली? हे विचारण्यासाठी अस्तित्वात असलेली महावितरणची हेल्पलाइन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पर्सनल नंबर रात्रीपासून दिवसभर खणखणत होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वारे आणि पाऊस सुरू हाेताच शहरातील बहुतांश भागातील वीज गुल झाली होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता गेलेली वीज शुक्रवारी दुपारपर्यंत आलेली नव्हती. त्याचा परिणाम शहरातील नागरिकांना सहन करावा लागला आहे. अनेक इमारतींच्या लिफ्ट बंद होत्या. रात्रभर वीज नसल्यामुळे गर्मी, डासांच्या त्रासांमुळे झोप न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना क्लासेसला तर नोकरदारांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. त्याशिवाय प्रत्येकाच्या अत्यावश्यक असलेल्या उपकरणांचाही वापर करता आला नाही. महावितरणच्या गोंधळलेल्या कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
आकडेवारी- शहर मंडळात ३३ केव्ही क्षमतेची एकूण २८ उपकेंद्रे- ११ केव्ही क्षमतेचे २१० फीडर
छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात ग्राहकांची संख्याघरगुती : ३ लाख ०९ हजार ९५७व्यावसायिक : ३६ हजार ७३४औद्योगिक : ६ हजार ९३८इतर : ६ हजार ४१५एकूण : ३ लाख ६० हजार ०४४
महावितरणची हेल्पलाइन बंदमहावितरणचा हेल्पलाइन क्रमांक सातत्याने बंद असतो. तक्रारी नोंदवायला सुरू केलेला व्हॉट्सॲप हेल्पडेस्कही केवळ नावालाच उरला आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त केला आहे.
- महापालिकेच्या जय विश्वभारती कॉलनीतील पंप हाऊस येथे सायंकाळी ५:४० वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. २० मिनिटांनी परत आला.- हर्सूल पाणीपुरवठा केंद्रात शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीन वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला.- क्रांतिचौक येथे रात्री ७:३० वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. अर्ध्या तासानंतर पूर्ववत.- मुकुंदवाडी भागातही एक तास विद्युत पुरवठा खंडित.- चिकलठाणा विमानतळासमोर रात्री ७ वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित, एका बाजूचे पथदिवे बंद.- महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी भागातील इटखेडा, ऑरेंज सिटी, गिरिजा शंकर विहार, कांचनवाडी, लक्ष्मीनगर, वाल्मी परिसर, नक्षत्रवाडी, बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागील काही भागात १८ तासांपेक्षा अधिक कालावधीत वीजपुरवठा खंडित झालेला होता.
या भागांना बसला फटकादेवळाई, माऊलीनगर, नाईकनगर, कृष्णनगर, चिकलठाणा, नंदनवन काॅलनी, विश्वभारती कॉलनी, हर्सूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा, इटखेडा, ऑरेंज सिटी, गिरिजा शंकर विहार, कांचनवाडी, लक्ष्मीनगर, वाल्मी परिसर, नक्षत्रवाडी, बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागील भाग, सातारा परिसर, खोकडपुरा, बेगमपुरा, पुंडलिकनगर, सिडको, टीव्ही सेंटर परिसर.
देवळाईकरांसाठी रोजचेचदेवळाई, माऊलीनगर, नाईकनगर, कृष्णनगर आणि खडी रोड परिसरातील नागरिकांना रोजच अघोषित वीज कपातीचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या हद्दीच्या वादात अर्धा भाग ग्रामीण, अर्धा शहरी या गोंधळाचा फटका या परिसराला बसतोय. रोज किमान २ ते ३ वेळा वीजपुरवठा खंडित होतो. परिसरात मोठ्या प्रमाणात ६ ते ८ मजली इमारती उभ्या राहत असून, वीज गेल्यावर लिफ्ट थांबतात. परिणामी, वृद्ध व लहान मुले लिफ्टमध्ये अडकण्याचे प्रकार वारंवार घडत असून जीव मुठीत घेऊन राहावे लागते.
महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीपर्यंत १८ तास वीज गुलमहानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीपर्यंत १८ तासांपासून विद्युत पुरवठा बंद होता. त्यात इटखेडा, ऑरेंज सिटी, गिरिजा शंकर विहार, कांचनवाडी, लक्ष्मीनगर, वाल्मी परिसर, नक्षत्रवाडी, बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागील भागातील वीज गायब झालेली होती. त्यामुळे नागरिकांसह माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
२४ तासांनंतरही वीजतारा लटकलेल्याचचिकलठाणा औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या आहेत. त्या २४ तासांनंतर तशाच लटकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. ब्रिजवाडी वसाहतीत वीज पुरवठा करणारी तार सायंकाळपर्यंत धोकादायकरीत्या लटकलेलीच होती. महावितरणला नागरिकांनी सातत्याने संपर्क करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शुक्रवार हा महावितरणचा देखभाल-दुरुस्ती दिवस असल्याने सायंकाळपर्यंत नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागली.
महावितरण पंचनामा करेना११ जून रोजी वादळवाऱ्यामुळे न्यायनगरमधील सार्थक देवरे या कुटुंबीयांच्या घरातील विजेच्या उपकरणांसह संसारापयोगी वस्तू जळाल्या. महावितरणकडे तक्रार करून तीन दिवस झाले, मात्र पंचनामा करण्यास कुणीही आलेले नाही. पंचनामा होईपर्यंत घरात कुणीही राहू नका, असे कंपनीच्या स्थानिक कनिष्ठ अभियंत्यांनी सांगिल्यामुळे देवरे यांचे कुटुंब तीन दिवसांपासून शेजाऱ्यांकडे राहत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक राजू वैद्य यांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे पंचनामा तातडीने करण्याची मागणी केली. अभियंत्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिल्यामुळे मुख्य अभियंत्यांपर्यंत हे प्रकरण गेले. तरीही याप्रकरणात पंचनामा करण्यासाठी कंपनीने निर्णय घेतलेला नाही. काल्डा कॉर्नर परिसरातील एका डॉक्टर कुटुंबाला दोन दिवसांपासून वीजपुरवठा नाही. त्यांच्याकडे कंपनीच्या लाइनमनने जाऊन साधी विचारणादेखील केली नसल्यामुळे उच्चभ्रू वसाहतीतील नागरिकांमधून संताप व्यक्त झाला.
शुक्रवारी सायंकाळी वीज पुरवठा सुरळीतशहरात ११ जून राेजी झालेल्या वादळवाऱ्यामुळे अनेक झाडे, होर्डिंग्ज वीज वाहिन्यांवर पडली होती. त्याची पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत केला. क्रांतिचौक, चिकलठाणा येथे वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, नंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला. म्हाडा कॉलनी येथील विद्युत ट्रान्सफाॅर्मरची क्षमता वाढविण्यात आली. चिकलठाणा येथील भूमिगत केबलचा प्राॅब्लेम झाला होता. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्व शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.- मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता महावितरण शहर.