'शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबत बोलणी होती, आम्ही आमचे गणित जुळवले'; सावेंनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:06 IST2026-03-18T19:06:05+5:302026-03-18T19:06:05+5:30
भाजपच्या विजयानंतर अतुल सावेंचा शिंदेसेनेवर थेट हल्ला, 'केसाने गळा' कापल्याच्या आरोपाचे खंडन

'शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबत बोलणी होती, आम्ही आमचे गणित जुळवले'; सावेंनी साधला निशाणा
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. "शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठरलेला अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला मोडीत काढला आणि सदस्यांना चक्क गोव्याला नेले. माझ्याकडे त्या सर्वांचे बोर्डिंग पास आहेत," असा खळबळजनक दावा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केलेल्या 'केसाने गळा कापला' या आरोपाचाही सावेंनी खरपूस समाचार घेतला.
सत्तारांची 'पुत्रमोहा'तून दगाबाजी?
अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईत ठरल्याप्रमाणे पहिले अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष होणार होता. मात्र, शिंदेसेनेतील दोन आमदारांना आपल्या मुलाला आणि पुतण्याला अध्यक्ष करायचे होते. त्यासाठी त्यांनी भाजपला अंधारात ठेवून ठाकरेसेना आणि अपक्षांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. "आम्ही दगाबाजी केली नाही, उलट शिंदेसेनेनेच फोन बंद करून संपर्क तोडला, त्यामुळे आम्हाला आमचे गणित जुळवावे लागले," असे सावे यांनी स्पष्ट केले.
"सत्तारांनी मतदारसंघ सांभाळावा"
शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधताना सावे म्हणाले की, "तुम्ही आता शांत बसा आणि आपला मतदारसंघ सांभाळा. भाजप तिथे ५० टक्के जागांवर जिंकला आहे." महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपसोबत ठाम असल्याचे सांगत सावे यांनी शिंदेसेनेची कोंडी केली. या विजयामुळे जिल्ह्यात भाजप 'किंगमेकर' ठरली असली, तरी सत्तार आणि सावे यांच्यातील या वादामुळे महायुतीमधील दरी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.