ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगरकरांना दहा दिवसानंतर पाणीपुरवठा; गॅप कमी कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 20:21 IST2026-04-09T20:20:59+5:302026-04-09T20:21:30+5:30
छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी दाहीदिशा; वाढीव पाणी येण्यासाठी अजून काही महिन्यांची प्रतीक्षा, तोवर काय?

ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगरकरांना दहा दिवसानंतर पाणीपुरवठा; गॅप कमी कधी होणार?
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी गत महिन्यात विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला. प्रत्यक्षात याची अंमलबजावणीच झाली नाही. ऐन उन्हाळ्यातही शहरातील विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाणी संपल्यावर नागरिकांना खासगी टँकर मागवावे लागत आहेत. अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी जारचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना जायकवाडीचे पाणी येणार, पाणी येणार या आशेवर ठेवण्यात येत आहे. वाढीव पाणी येण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.
महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यावर समीर राजूरकर यांनी पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन विषयात लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले होते. जायकवाडीहून सध्या येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करण्याचे आदेश महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिले होते. गॅप कमी करण्याबद्दलचा आराखडा २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी आराखडा सादर केला. आराखड्यानंतर महापौरांनी पाणी वितरणाच्या पद्धतीत काही सुधारणा करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. सुधारणा करून पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करा, उन्हाळ्यात नागरिकांना त्रास होऊ देऊ नका असे आदेश देखील त्यांनी दिले.
महापौरांच्या आदेशानंतरही पाणीपुरवठ्यातील गॅप कमी झालेला नाही. नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतरच पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आराखडा सादर करुन मोकळे झाले का? गॅप कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आले नाहीत. नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.