३०० वर्ष जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड; छावणी नाका-देवगिरी टी पॉईंट रस्ता रुंदीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 20:02 IST2026-03-21T20:01:37+5:302026-03-21T20:02:29+5:30
यातील काही वृक्ष ५० वर्षांपासून तब्बल ३०० वर्षांपर्यंत वयाचे असल्याने ते ऐतिहासिक वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) मानले जातात.

३०० वर्ष जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड; छावणी नाका-देवगिरी टी पॉईंट रस्ता रुंदीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध
छत्रपती संभाजीनगर : छावणी नाका ते देवगिरी टी पॉईंट या मार्गाच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासन आणि स्थानिक मंत्री आग्रही असताना या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या मार्गावर मोठी झाडे असून त्यामध्ये वड, पिंपळ, महारुख, लिंब, आदी प्रजातींचा समावेश आहे. यातील काही वृक्ष ५० वर्षांपासून तब्बल ३०० वर्षांपर्यंत वयाचे असल्याने ते ऐतिहासिक वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) मानले जातात.
पर्यावरणप्रेमींच्या मते, शहराला प्राणवायू पुरवठा करणाऱ्या या झाडांवर कुऱ्हाड चालवून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास तज्ज्ञ समितीकडून करण्यात आलेला नाही. तसेच झाडांची तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणीही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ८० वर्षे वयाचे एक झाड रोज किमान ५०० ते १००० लोकांना आवश्यक असणारा प्राणवायू पुरवते. या मार्गावर वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठे असल्याने ही जुनी झाडे प्रदूषण शोषण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे ही झाडे तोडल्यास परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने या मार्गावरील अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्ता बराचसा मोकळा झाला आहे. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, पडेगाव मारुती मंदिर ते छावणी नाका या भागात सकाळी व संध्याकाळी फारतर अर्धा तास वाहतूककोंडी होत असते. तीही मुख्यतः वाहनचालकांच्या घाईमुळे आणि वाहतूक शिस्तीच्या अभावामुळे होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या मार्गाला समांतर असलेला धुळे–सोलापूर महामार्ग बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत नसल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच पडेगाव परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती असल्यास कोंडी टाळता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरणप्रेमींच्या मते, झाडे तोडण्याऐवजी झाडे जपूनही रस्ता विकसित करता येऊ शकतो, असे अनेक देशांत केले जाते. मराठवाड्यात आधीच हरित क्षेत्र फक्त २ टक्के उरले असून, शहरात ते सुमारे ४ टक्के असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असल्याने शहर वाळवंटीकरणाच्या दिशेने जात असल्याची भीती मानद वन्यजीव सदस्य डॉ. किशोर पाठक, ॲड. निरंजन देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.