आराम करण्याच्या बहाण्याने नातेवाइकांनीच चोरले १२ तोळे सोने; पती-पत्नीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:54 IST2026-03-07T15:54:19+5:302026-03-07T15:54:32+5:30
लग्नाच्या गडबडीत नातेवाइकानेच दाखवला हातगुण, सिटीचौक पोलिसांत तक्रार

आराम करण्याच्या बहाण्याने नातेवाइकांनीच चोरले १२ तोळे सोने; पती-पत्नीवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: प्रकृती बिघडल्यानंतर आराम करण्यासाठी घरात थांबलेल्या एका नातेवाइकानेच व्यापाऱ्याच्या विश्वासाला तडा देत चक्क १२.६ तोळे सोन्याचे दागिने आणि ३०० ग्रॅम चांदी लंपास केली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने संशय व्यक्त केल्यावरून सिटीचौक पोलीस ठाण्यात पुण्यातील निखिल आणि वर्षा नावाच्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाच्या धांदलीत झाला 'हातसाफ'
मनोज बोंबले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाइकाचे लग्न होते. या दरम्यान निखिल नावाचा नातेवाइक घरी आलेला होता. घरातील कपाटात सोन्याचे दागिने असल्याचे त्याने अनेकदा पाहिले होते. लग्नाच्या दिवशी दुपारी २:३० च्या सुमारास निखिलने प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून बोंबले यांच्या घरी आराम करायला जातो असे म्हटले. सर्व कुटुंबीय लग्नात व्यस्त असताना तो घरात एकटाच होता. ४:३० वाजता तो पुन्हा लग्नासाठी बाहेर पडला.
५ दिवसांनंतर चोरी उघड
लग्नाचे सोपस्कार आटोपल्यानंतर ३ मार्च रोजी मनोज बोंबले यांनी घरातील कपाट तपासले असता, त्यांना धक्काच बसला. कपाटातील १२.६ तोळे सोने आणि ३०० ग्रॅम चांदी गायब होती. केवळ निखिल आणि वर्षा हेच घरात एकटे असल्याने त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय बोंबले यांनी व्यक्त केला आहे. सिटीचौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.