"गरीबी अन् त्यात भावाचं निधन..."; हतबल आई-वडिलांनी मुलीचं लावलं होतं लग्न, पोलिसांनी मांडवातून रोखला बालविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:35 IST2026-03-17T12:30:45+5:302026-03-17T12:35:01+5:30
दामिनी पथकाला अज्ञाताचा कॉल; पोलिसांनी धाव घेत थांबवला बालविवाह, दोन्ही कुटुंबाला दिली समज

"गरीबी अन् त्यात भावाचं निधन..."; हतबल आई-वडिलांनी मुलीचं लावलं होतं लग्न, पोलिसांनी मांडवातून रोखला बालविवाह
छत्रपती संभाजीनगर : काबाडकष्ट करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह जिकिरीचा झाला. नुकतेच कमवायला लागलेल्या मोठ्या भावाचे अपघाती निधन झाले. घरात एक अपंग लहान बहीण असल्याने आर्थिक संकट झेपत नव्हते. या तणावातून आई-वडिलांनी मुलीचा सतराव्या वर्षीच लग्नाचा घाट घातला. मात्र, याची माहिती मिळताच दामिनी पथकाने धाव घेत हा बालविवाह थांबवून दोन्ही कुटुंबाला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली.
सोमवारी सायंकाळी मुकुंदवाडीच्या राजनगरमध्ये बालविवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. दामिनी पथकाच्या प्रभारी कांचन मिरधे यांच्या सूचनेवरून पथकाच्या मुख्य अंमलदार कल्पना खरात, मोनिका दिवे, सुनीता नागलोद, मुकुंदवाडी ठाण्याचे अंमलदार मतीन अलीम शेख, महिला बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे, सचिन दौंड यांनी राजनगरमध्ये धाव घेतली. लग्नाची तयारी सुरू असतानाच पोलिस आल्याने मंडपात एकच धांदल उडाली. काही नातेवाईक मंडप सोडून दूर अंतरावर जाऊन उभे राहिले. पोलिसांनी कुटुंबाकडे चौकशी केली. त्यात मुलीचे वय १७, मुलाचे २० वर्षे असल्याचे समोर आले. एकतर आर्थिक अडचण, त्यातच नात्यातूनच २० वर्षीय शेतकरी मुलाचे स्थळ आल्याने आई-वडीलही लग्नासाठी तयार झाल्याची कबुली त्यांनी दिली.