खुर्ची टेम्पररी अन् मैत्री पर्मनंट असते, छत्रपती संभाजीनगराने दिलेले प्रेम विसरता येणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भावोत्कट उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:30 IST2025-06-27T15:21:44+5:302025-06-27T15:30:02+5:30
सरन्यायाधीश यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या वास्तव्यातील अनेक घटना, घडमोडी व आठवणींना उजाळा दिला.

खुर्ची टेम्पररी अन् मैत्री पर्मनंट असते, छत्रपती संभाजीनगराने दिलेले प्रेम विसरता येणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भावोत्कट उद्गार
छत्रपती संभाजीनगर : खुर्ची टेम्पररी अन् नातेसंबंध पर्मनंट असतात. औरंगाबाद खंडपीठाने दिलेले प्रेम विसरता येणार नाही, असे भावोत्कट उद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी येथे सत्काराला उत्तर देताना काढले.
सरन्यायाधीश यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या वास्तव्यातील अनेक घटना, घडमोडी व आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आपल्या हृदयात माझ्याविषयी जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम मला नागपूर, अमरावती व याशहराविषयी आहे. मी तुमचाच आहे व तुम्ही माझे आहात. आतापर्यंत जसे प्रेम दिले, तसेच पुढेही देत राहा. देशाची सेवा करण्याचा आशीर्वाद द्या’, अशी सादही त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहाला घातली. जोडलेले मित्र, कोर्टात अधूनमधून झालेले मतभेदसुद्धा कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी विशद केले. ते म्हणाले, ‘खुर्ची येते व जाते. प्रेम मात्र कायम राहते. मी गेलो तेथे मित्र जोडत गेलो.’
यावेळी त्यांनी ॲड. एस.के. शेळके, ॲड. बनकर पाटील, ॲड. नंदकुमार खंदारे, भरत वर्मा, ॲड. श्रीराम वर्मा, ॲड. अमोल सावंत, ॲड. वसंतराव साळुंके, ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन. धोर्डे, प्रवीण मंडलिक, व्ही.डी. होन यांच्यासह न्यायमूर्ती तात्यासाहेब ऊर्फ बी.एन. देशमुख यांचा विशेष उल्लेख केला. न्या. के.यू. चांदीवाल, आर.एम. बोर्डे, साधना जाधव, प्रसन्ना वराळे, संभाजी शिंदे, सुनील देशमुख आदी न्यायमूर्तींचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर सरन्यायाधीशांनी विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकांचा नामोल्लेखही यावेळी केला. ॲड. नेहा कांबळे सतत चांगले सूत्रसंचालन करते, अशी प्रशंसाही त्यांनी केली. अनेकांची नावे घेत, त्यांचे हसविणारे किस्सेही सांगितले.
...त्याचा मला कायम खेद राहील
सरन्यायाधीश म्हणाले, ‘अनेकदा चांगले काम करूनही संधी मिळेलच, असे नाही. अनेकदा प्रयत्न केले तरी नियती आपल्या बाजूने नसते. न्या. संजय गंगापूरवाला हे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकले नाहीत. हा सर्वोच्च न्यायालयाचा तोटा आहे व माझी ही खंतही आहे.’
औरंगाबाद खंडपीठात मोठे पोटेन्शिअल
मी न्यायमूर्ती झाल्यानंतर येथे जवळपास सहा वर्षे न्यायदान केले. येथील वकिलांमध्ये मोठी क्षमता आहे. या क्षमतेवर अनेकदा संशय व्यक्त झाला; परंतु या खंडपीठाने अनेक न्यायमूर्ती दिले. त्यापैकी चार राज्यांचे मुख्य न्यायमूर्ती झाले. वराळे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असून, तेथे येथील अन्य तीन ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. यामुळे माझी अपेक्षापूर्ती झाली. औरंगाबाद खंडपीठ देशात सतत नाव उंचावेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नितीन सांबरे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची समयोचित भाषणे झाली. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बोरूलकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. गीता देशपांडे, ॲड. राजेंद्र गोडबोले, ॲड. श्रीकांत अदवंत, ज्येष्ठ विधिज्ञ बी.आर. कातनेश्वरकर, नंदकुमार खंदारे व आर.एन. धोर्डे, राज्य वकील परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख, मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे व ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरन्यायाधीशांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वकील संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कवडे व शिल्पा अवचार- शेरखाने, सहसचिव शरद शिंदे व सुस्मिता दौंड, कोषाध्यक्ष राम थोरात, ग्रंथालय समिती अध्यक्ष बळीराम शिंदे व सचिव विश्वेश्वर पठाडे आणि सदस्य अक्षरा मडके, नसीम बानू देशमुख, मयूर बोरसे, कृष्णा भोसले, उमेश गीते, संकेत पळणीटकर, आशुतोष शिसोदिया, राहुल सूर्यवंशी व ओमप्रकाश तोटावाड यांनी प्रयत्न केले. ॲड. रवींद्र गोरे यांनी आभार मानले.