रिक्षाचालकांच्या मुजोरील ब्रेक; छत्रपती संभाजीनगरात ४४० रिक्षांची चौकशी, ६ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST2025-06-11T16:20:47+5:302025-06-11T16:21:05+5:30
चौकशीसाठी पोलिस अखेर रस्त्यावर; मुख्यालयाने कुमक पाठवली, ७ महिन्यांतील तिसरी मोहीम

रिक्षाचालकांच्या मुजोरील ब्रेक; छत्रपती संभाजीनगरात ४४० रिक्षांची चौकशी, ६ लाखांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक झाले आहे. हत्येपर्यंत त्यांची मजल गेली आहे. अखेर पोलिसांना जाग आली असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील अंमलदार देत ५ तासांत तब्बल ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी करण्यात आली. यात बेशिस्त रिक्षाचालकांना ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गेल्या ७ महिन्यांतील ही रिक्षाचालकांविरोधातली तिसरी मोहीम आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी याही वेळेस कारवाईचा सोपस्कार केला आहे की कारवाईत सातत्य राहणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
किरकोळ कारणावरून रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर चाकूहल्ला, लूटमार, महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना सतत घडत आहेत. ४ जूनला नशेखोर रिक्षाचालकाने प्रवाशाची हत्या करत गुन्हेगारीची परिसीमा दाखवून दिली. या घटनेमुळे रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब झाली आहे. शहरातील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्यासंदर्भात ‘लोकमत’ने घटनांचा आढावा घेत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेतली गेली. अखेर मंगळवारी वाहतूक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले गेले.
एकूण ५ तास तपास मोहीम सुरू होती. भगवान महावीर चौक, सिडको चौक, एसएफएस शाळा, व्हिट्स हॉटेल, वाळूजमध्ये एकाच वेळी मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत संपूर्ण वाहतूक पाेलिस रस्त्यावर मोहिमेसाठी उतरले हाेते. त्यांच्या मदतीसाठी मुख्यालयातील अंमलदारांची कुमक पाठवली.
४४० रिक्षाचालकांची चौकशी
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५ तासांच्या कारवाईत जवळपास ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी करण्यात आली. यात नियम मोडणाऱ्या चालकांकडून एकूण ६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
पिलीसांनाही जुमानत नाहीत
कारवाईदरम्यान ‘लोकमत’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत पोलिसांसमक्ष रिक्षाचालकांची मुजाेरी पाहायला मिळाली. सिडको चौकात पोलिस समोर असतानाही रिक्षाचालक कर्कश आवाजात गाणे वाजवत जाताना दिसले. तर अनेकजण सुसाट वेगात जात होते. आकाशवाणी चाैकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना एक चालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता. पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. तरीही बेदरकारपणे चालक रिक्षा पुढे दामटत होता. या झटापटीत देवकर यांचे मनगटी घड्याळ तुटून पडले.
दंडाची भीती कोणाला?
ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाहतूक दंडाची भीतीच नाहीशी झाल्याचे वाहतूक पाेलिस सांगतात. अनेक रिक्षाचालक पोलिसांना दंड पाठवून द्या, असे म्हणत रिक्षा पुढे दामटतात.
पोलिस हे कधी करणार?
- रिक्षाचालकांध्ये असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधासाठी पोलिसांचे काय नियोजन आहे?
- रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार?
- रात्री कर्कश आवाजात गाणे वाजवत, सुसाट रिक्षा दामटवणाऱ्यांवर लक्ष कोण ठेवणार?
- कारवाईचा केवळ सोपस्कारच बजावणार की सातत्य राहणार?