गणरायाला निरोप देताना दोघांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: September 10, 2014 00:53 IST2014-09-10T00:32:15+5:302014-09-10T00:53:03+5:30

औरंगाबाद : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Both of them die drowning while giving a call to Ganaraya | गणरायाला निरोप देताना दोघांचा बुडून मृत्यू

गणरायाला निरोप देताना दोघांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वडगाव कोल्हाटी पाझर तलाव आणि गेवराई तांडा येथील शेततळ्यात या दुर्दैवी घटना घडल्या.
घटनांबाबत पोलिसांनी सांगितले की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील राहुल इंडस्ट्री या कंपनीत गणेशाची स्थापना करण्यात आली होती. काल विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यात कंपनीतील इतर कामगारांबरोबरच संतोष विठ्ठल सोनवणे (२१, रा. श्रमसागर सोसायटी, बजाजनगर) हाही सहभागी झाला होता. ही मिरवणूक वडगाव येथील पाझर तलावाजवळ पोहोचली. तेव्हा गणेशमूर्ती घेऊन संतोष तलावात उतरला. त्याच वेळी पाय घसरून तो तलावात पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले. नंतर जवानांनी पाण्यात जाऊन संतोषला बाहेर काढले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना गेवराई तांडा परिसरात घडली. मूळ जालना जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी असलेले दगडू मोघाजी भोजने (४०) हे गेल्या काही वर्षांपासून गेवराई तांडा येथे राहतात. ते ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहेत. काल दुपारी गावातील छोटे- मोठे गणपती घेऊन ते काही नागरिकांसह विसर्जनासाठी शिवारातील शेततळ्यावर आले. एक मूर्ती विसर्जनासाठी घेऊन ते तळ्यात उतरले आणि पाय घसरून पडले. बराच वेळ झाला तरी ते काही बाहेर येईनात. तेव्हा इतर नागरिकांनी तळ्यात उड्या मारल्या व त्यांना तळ्यातून बाहेर काढले. तोपर्यंत ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी घाटीत आणण्यात आले; परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या दोन दुर्घटना वगळता जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.
बुडणाऱ्या दोघांना वाचविले
औरंगाबाद : स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तलावात उडी घेऊन दोन तरुणांनी बुडणाऱ्या दोघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याची घटना सोमवारी सायंकाळी दौलताबाद घाटाजवळ घडली.
पडेगाव येथील अशोक पठाडे आणि मिलिंद गातेगावकर, अशी या दोन जिगरबाज तरुणांची नावे आहेत. दौलताबाद येथील गवळीवाडा येथील रहिवासी अशोक दांडगे (२२) आणि प्रमोद गवळी (१९) हे दोघे सोमवारी सायंकाळी दौलताबाद घाटाजवळील तलावात गणेश विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोघे तलावात पडले. हा प्रकार गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या लक्षात आल्याने आरडाओरडा सुरू झाला. याच वेळी पडेगाव शिवशक्ती गणेश मंडळाचे हा प्रकार मंडळाचे अध्यक्ष किसन पेहरकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पट्टीचा पोहणारा असलेला मंडळाचा सदस्य अशोक पठाडे यास कल्पना दिली. लगेच अशोकने जिवाची पर्वा न करता तलावात उडी मारली. मिलिंद गातेगावकर यानेही त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर दोघांनी अशोक दांडगे आणि प्रमोद गवळी यांना बाहेर काढले. दोघांच्या प्रयत्नाने जीवदान मिळाल्याने दोघांच्या कुटुंबियांनी मंगळवारी अशोक पठाडे आणि मिलिंद गातेगावकर यांचा सत्कार केला.

Web Title: Both of them die drowning while giving a call to Ganaraya