घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ५ दिवसांचा साठा शिल्लक, रक्तदानाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:35 IST2026-03-17T13:30:38+5:302026-03-17T13:35:01+5:30
खासगीत महिनाभराचा साठा, सरकारी रुग्णालयाची स्थिती चिंताजनक

घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ५ दिवसांचा साठा शिल्लक, रक्तदानाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : शहरातील खासगी रक्त केंद्रांमध्ये सध्या १५ ते ३० दिवसांचा तर घाटी रुग्णालयातील विभागीय रक्त केंद्रांत केवळ ५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे. उन्हाळ्याची सुरुवात, परीक्षेच्या कालावधीमुळे रक्तदानात घट झाली आहे. घाटीत दररोज रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घाटी रुग्णालयात दररोज ७० ते १०० नवे रुग्ण भरती होतात. दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांचाही भार घाटीतील विभागीय रक्त केंद्रावरच आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वाधिक रक्ताची आवश्यकता असते; परंतु काही दिवसांपासून रक्तदान घटल्याने रक्तसाठ्यावर परिणाम झाला आहे. रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
खासगी रक्त केंद्रांची स्थिती
शहरात १३ रक्त केंद्रे आहेत. दत्ताजी भाले रक्तकेंद्राचे जनसंपर्क अधिकारी आप्पा सोमासे म्हणाले, सध्या एक महिना पुरेल इतका साठा आहे. एप्रिल, मे महिन्यात शिबिर होत नाही. आता रक्त संकलन होणे आवश्यक आहे. लायन्स ब्लड बँकेचे सोशल वर्कर श्यामराव सोनवणे म्हणाले, आमच्याकडे सध्या १५ ते २० दिवसांचा साठा आहे. अमृता ब्लड सेंटरचे विशाल जैन म्हणाले, आमच्या केंद्रात सध्या १०-१२ दिवसांचा साठा आहे.
रक्तदानासाठी पुढे यावे
सध्या घाटीतील विभागीय रक्त केंद्रात ५ दिवस पुरेल इतका रक्त साठा आहे. रोज ७० ते ८० रुग्णांना रक्त दिले जाते. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे
- डाॅ. वैशाली नागोसे, प्रभारी विकृतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी