‘ब्लॅक स्पॉट्स’वर सावध..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ ठिकाणी मृत्यू दबा धरून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:45 IST2026-03-20T17:42:31+5:302026-03-20T17:45:01+5:30
प्रादेशिक परिवहन विभाग विशेष अहवाल; खतरनाक ‘ब्लॅक स्पॉट्स’ ठरताहेत मृत्यूचा सापळा, दोन वर्षांत २,८३६ जणांचा रस्ते अपघातात बळी

‘ब्लॅक स्पॉट्स’वर सावध..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ ठिकाणी मृत्यू दबा धरून
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील रस्त्यांवर अपघातांचा अक्षरशः ‘काळा नकाशा’ तयार झाला असून, तब्बल २०९ ब्लॅक स्पॉट्स नागरिकांसाठी खतरनाक बनले आहेत. गेल्या दोन वर्षांत झालेल्या भीषण अपघातांमध्ये २ हजार ८३६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार ७५ टक्क्यांहून अधिक अपघातांचे मूळ कारण ‘वाहनांचा अतिवेग'' असले, तरी रस्त्यांची सदोष अभियांत्रिकी रचना आणि ब्लॅक स्पॉट्सवरील उपाययोजनांचा अभाव हीदेखील कारणे आहेत.
केवळ दंडात्मक कारवाई करून हे सत्र थांबणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वेगावर नियंत्रण ठेवणे आणि ''रोड सेफ्टी ऑडिट''नुसार तातडीने दुरुस्त्या करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राष्ट्रीय महामार्ग तसेच समृद्धी महामार्ग ही प्रमुख ठिकाणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यातील महामार्गांसह जालना रोड, जळगाव रोडवरील विविध ठिकाणे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. दुसरीकडे, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात चिंता निर्माण करणारे आहेत. सावंगी इंटरचेंज ते हडस पिंपळगाव या पट्ट्यात वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने येथे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
९० ठिकाणी तांत्रिक सुधारणा
जिल्ह्यातील २०९ ब्लॅक स्पॉट्सपैकी केवळ ९० ठिकाणी आतापर्यंत तांत्रिक सुधारणा झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणी अद्यापही मृत्यू दबा धरून बसला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, एएचएआय, एमएसआरडीसी, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, पोलिस विभाग, राज्य महामार्ग पोलिस यांच्या उपाययोजनांसह शिक्षण विभागानेही अपघाताच्या संदर्भात जनजागृतीसाठी पाऊल टाकले आहे.
किती अपघात, किती मृत्यू, किती जखमी?
२०२४ मध्ये जिल्ह्यात एकूण ६५१ भीषण अपघात झाले होते, ज्यामध्ये १ हजार ३६३ जणांचा मृत्यू झाला, तर ८६२ जण गंभीर जखमी झाले होते. मात्र, २०२५ हे वर्ष अधिकच जीवघेणे ठरले. या एका वर्षात अपघातांची संख्या ७०१ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा १ हजार ४७३ पर्यंत गेला. तर ९९७ लोक जखमी झाले. यात अनेकजण दिव्यांग झाले.
अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नशील
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्या अहवालानुसार उपाययोजना करण्यासाठी, अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी जिल्ह्यात सर्व विभाग प्रयत्नशील आहेत.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी