औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पारधी मुलांच्या हाती दिली ‘पाटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:07 IST2019-07-08T20:06:39+5:302019-07-08T20:07:46+5:30

इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते.

Aurangabad Rural Police gives 'Pen' to Paradhi community students | औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पारधी मुलांच्या हाती दिली ‘पाटी’

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पारधी मुलांच्या हाती दिली ‘पाटी’

- बापू सोळुंके 

इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते. पोलीस या वसाहतींवर केवळ धाड मारण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, असा अनुभव आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मात्र या वसाहतींना सुधारणेचे दरवाजे खुले करून तेथे पालात राहणाऱ्या मुलांना त्यांनी शाळेत घातले. त्या मुलांना शालेय साहित्य प्रदान करून शिक्षणच तुम्हाला तारू शकते, हे पटवून दिले. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसावा, याकरिता त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी पारधी वसाहती आहेत. इंग्रज देश सोडून गेले. मात्र, पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. आजही कोठे दरोडा पडला, मोठ्या चोऱ्या अथवा एखादा मोठा गुन्हा घडल्यास पोलिसांकडून पारधी वसाहतींवर धाडी टाकल्या जातात. पारधी वसाहतीमधील संशयितांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये डांबले जाते. यामुळे पारधी वसाहतींकडे पोलीस आल्यास तेथील पुरुषांसह लहान, मोठे तरुण मुले लपून बसतात, नाही तर पळून जातात. गुन्हा केला नसला, तरी संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांचा पीसीआर काढला जातो.  परिणामी, पोलीस आणि पारधी समाज यांच्यात कायम छत्तीसचा आकडा राहिला आहे. गुन्हा केला नसतानाही पोलीस पकडतात, म्हणून या समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचेही दिसतात.  

पारधी समाजातील मोजक्या लोकांकडे अल्प शेती आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने या समाजातील पुरुष मंडळी एक तर मजुरी करतात नाही तर चोऱ्या, दरोडे टाकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी, आजही कोणत्याही पारधी वसाहतीमध्ये सर्व वयोगटातील लहान मुले उनाडक्या करताना दिसतात. नाही तर शहरात सिग्नलवर भीक मागताना आढळतात. शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो, याबाबत ठाम विश्वास असलेल्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नुकताच पारधी समाजाचा एक मेळावा घेतला. एवढेच नव्हे तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पारधी वसाहतीमधील १५ मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित केले.

या मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अधीक्षकांनी २९ जून रोजी अधीक्षक कार्यालयात मेळावा घेतला. पारधी समाजातील शिकून मोठे झालेल्या काही तरुण आणि तरुणींना त्यांनी मेळाव्याला बोलावले होते. तसेच पारधी समाजाचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पारधी वसाहतींवर जाऊन त्यांना तेथे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदी देण्याची तयारी तहसीलदारांनी दर्शविल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या या सकारात्मक पावलामुळे पोलिसांचा पारधी समाजाकडे आणि पारधी समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, अशी आशा करूया.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पारधी समाजाचा पोलिसांबद्दलचा विश्वास वाढीस लागू शकतो. मात्र, त्यासाठी पोलिसांना सतत या समाजाच्या वसाहतींवर जाऊन त्यांची मने जिंकावी लागतील. एवढेच नव्हे तर नव्याने शाळेत दाखल झालेल्या मुलांची गळती होणार नाही, यासाठी मुले आणि त्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संपर्कात सतत राहावे लागेल. 

Web Title: Aurangabad Rural Police gives 'Pen' to Paradhi community students