मैत्रिणीसोबत बोलल्याचा राग, बारावीतल्या मुलाचे अपहरण; बेदम मारहाणीनंतर १२ तासांनी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:56 IST2025-06-10T11:56:04+5:302025-06-10T11:56:55+5:30
महाविद्यालयातील अल्लड भावना, ईर्षा आणि वाद : लोखंडी रॉड, बेल्टने शरीर सुजेपर्यंत मारहाण

मैत्रिणीसोबत बोलल्याचा राग, बारावीतल्या मुलाचे अपहरण; बेदम मारहाणीनंतर १२ तासांनी सोडले
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीसोबत बोलल्याच्या रागातून बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलाचे तिघांनी तब्बल १२ तास अपहरण केले. देवळाईच्या पुढील साई टेकडी परिसरात नेऊन लाथाबुक्क्यांनी, कंबरेच्या बेल्टने शरीर सुजेपर्यंत मारहाण करून बारा तासांनंतर त्याला खोलीवर नेऊन सोडले. रुग्णालयात उपचार घेऊन तरुणाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
मूळ सिल्लोड तालुक्यातील असलेला १७ वर्षीय आशिष (नाव बदलले आहे) नीटची तयारी करतो. उस्मानपुऱ्याच्या उत्सव चौकातील एका क्लासमध्ये त्याने प्रवेश घेतला असून, विकासनगरात किरायाने राहतो. ७ जून रोजी रात्री ८:३० वाजता तो मेसवर जेवण्यासाठी जात होता. यावेळी त्याच्या ओळखीचा अनिकेत त्याला भेटला. त्याच्यासोबत असलेल्या अजयने त्याला बळजबरीने कारमध्ये बसवले. तेव्हा कारमध्ये अनिकेत, अजयसोबत महेश आणि आणखी एक जण होता. कार प्रतापनगरच्या मैदानावर नेऊन सर्वांनी त्याला बेदम मारहाण केली. ‘तू त्या मुलीसोबत का बोलतोस?’ असे म्हणत अनिकेतने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तेथून साई टेकडी परिसरात नेले.
खासगी रुग्णालयात उपचार
साई टेकडी परिसरात सर्वांनी खाली उतरून पुन्हा आशिषला रस्त्यावर लाथाबुक्क्या, लोखंडी रॉड, कंबरेच्या बेल्टने संपूर्ण शरीर सुजेपर्यंत मारहाण केली. यात आशिष गंभीर जखमी झाला. रात्रभर त्याला त्याच अवस्थेत शहर आणि आसपासच्या परिसरात फिरवत धमक्या देणे सुरूच ठेवले. ८ जून रोजी सकाळी ८ वाजता त्याच्या खोलीजवळ नेऊन सोडून अपहरणकर्ते पसार झाले.
तू माझं वाटोळं केलं...
अनिकेत आणि आशिषमध्ये एका मुलीवरून वाद झाला होता. तिच्यासोबत बोलताना अनिकेतने आशिषला पाहिले होते. तेव्हापासून अनिकेतच्या मनात आशिषविषयी राग होता. आशिषला मारताना अनिकेत सतत ‘तू माझं वाटोळं केलं, आता मी तुझं करणार,’ असे म्हणत, जीवे मारण्याची धमकी देत होता. जखमी अवस्थेत आशिषने रुग्णालय गाठले. त्याच्या कुटुंबाने ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर, सायंकाळी त्यांनी निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरून चार अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पैठणचा रहिवासी असून, त्याचे वय तपासून योग्य कारवाई करू, असे येरमे यांनी सांगितले.