'भाजपकडून आमच्या झेडपी सदस्यांना पैशांचे आमिष'; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:04 IST2026-03-19T16:03:47+5:302026-03-19T16:04:26+5:30
"आमचे ५ सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटायला निघाले होते, पण..."; अंबादास दानवेंनी उघड केला जिल्हा परिषदेचा 'इनसाईड' ड्रामा

'भाजपकडून आमच्या झेडपी सदस्यांना पैशांचे आमिष'; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
छत्रपती संभाजीनगर: "जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने आमच्या सदस्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मनात सुरुवातीपासूनच पाप होते आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला अध्यक्षपद देऊ द्यायचे नव्हते," अशी घणाघाती टीका ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावर बोलताना त्यांनी भाजपवर 'पैशांच्या थैल्या' वाटल्याचा गंभीर आरोपही केला.
भिवंडी नाक्यावर सदस्यांची अडवणूक?
दानवे यांनी दावा केला की, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा ओएसडी भिवंडीच्या नाक्यावर ठाकरेसेनेच्या सदस्यांना अडवून त्यांना प्रलोभने दाखवत होता. "आमचे पाच सदस्य देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले होते, मात्र मी फोन केल्यानंतर ते परत आले. दुर्दैवाने आमचे दोन सदस्य (संजय निकम आणि ललिता सोनवणे) भाजपच्या नादी लागले, पण यासाठी मी त्यांना नाही तर भाजपच्या भ्रष्ट रणनीतीला दोष देतो," असेही दानवे म्हणाले.
रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणावरून दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "एखाद्या भोंदू बाबाचे पाय धुणे हा घाणेरडा प्रकार आहे. महिलांची सुरक्षा बघणे हे आयोगाचे काम आहे, मात्र अध्यक्षच अशा कृत्यांचे समर्थन करत असतील तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावे," अशी मागणी त्यांनी केली.
निसर्गाच्या चक्रात शेतकरी भरडला
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीवर भाष्य करताना दानवे म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या पाचवीलाच मरण पुजलेले आहे. अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचा मोहर आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे."