'कापून टाकू, ठोकून टाकू'; अंबादास दानवेंना अनोळखी क्रमांकावरून धमक्या, सुरक्षा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:37 IST2026-03-16T12:32:47+5:302026-03-16T12:37:48+5:30
"सुरक्षा काढली अन् धमक्या सुरू!"; अंबादास दानवेंना मध्यरात्री धमकीचा फोन, कुटुंबाची सुरक्षा ऐरणीवर

'कापून टाकू, ठोकून टाकू'; अंबादास दानवेंना अनोळखी क्रमांकावरून धमक्या, सुरक्षा ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने अनोळखी क्रमांकावरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा फोन करून "कापून टाकू, ठोकून टाकू" अशी धमकी दिल्यानंतर, दानवे यांनी आज सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता
या घटनेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "मी वैयक्तिक रित्या अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, मी दौऱ्यावर असताना घरी माझे कुटुंब असते. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये, ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे संशयित क्रमांक सोपवले असून कडक कारवाईची मागणी केली आहे."
सुरक्षा काढल्याने प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनाने सीआयडीच्या (CID) अहवालाचा दाखला देत दानवे यांची 'वाय' (Y) दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरील पोलीस पहारा आणि ताफ्यातील पोलीस गाडीही हटवण्यात आली होती. सुरक्षा काढल्यानंतर लगेचच अशा धमक्या येणे, यावर राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त केला जात आहे. दानवे यांनी स्वतःहून सुरक्षा मागितली नसली तरी, पोलीस प्रशासन आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.