कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:46 IST2025-06-27T14:46:26+5:302025-06-27T14:46:26+5:30
'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते: सरन्यायाधीश भूषण गवई

कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई
छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे, ही मागणी जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले. त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात, ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक असल्याचे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे गुरुवारी रात्री व्यक्त केले.
औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई आणि सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश बोरूलकर व सचिव अॅड. रवींद्र गोरे यांचीही विशेष उपस्थिती होती. सरन्यायाधीश म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते. त्यामुळे निर्णय हा एकमतानेच व्हायला हवा. एकट्याने काम करता येत नाही. घटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व माझे वडील रामचंद्र गवई यांच्या विचारांचा वारसा आणि समता, बंधुता व सामाजिक न्याय यांची जपणूक करीत वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानेच हा बहुमान मिळाला. हे सतीचे वाण असून, ते निष्ठापूर्वक पालन करण्याचा प्रयत्न मी कसोशीने करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
न्यायाधीश निवडीत गुणवत्ता महत्त्वाची
गवई कोलेजियमबाबत म्हणाले की, 'आम्ही नेहमीच गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिला आहे. उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी, हे कधीही निकष ठरत नाहीत. केवळ त्यांची पात्रता, ज्ञान व नीतिमत्ता हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.'