'२ तास मावशीपाशी बसले अन् मनमोकळं बोलले'; फुलंब्रीच्या मातीशी होतं अजितदादांचे प्रेमाचं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:16 IST2026-01-28T16:15:14+5:302026-01-28T16:16:54+5:30
अजितदादांचे फुलंब्रीशी होते रक्ताचे आणि रक्तापलीकडचे नाते; मावशीच्या गावात शोककळा

'२ तास मावशीपाशी बसले अन् मनमोकळं बोलले'; फुलंब्रीच्या मातीशी होतं अजितदादांचे प्रेमाचं नातं
फुलंब्री: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'लोहपुरुष' अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फुलंब्रीशी असलेले नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक होते. फुलंब्री हे दादांच्या मावशीचे गाव असल्याने, या मातीशी त्यांचे बालपणापासूनचे ऋणानुबंध जोडले गेले होते. आज दादांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण फुलंब्री तालुका सुन्न झाला असून, देशमुख कुटुंबासह गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
मावशीच्या कुशीत विरघळणारा 'कडक' बाणा
अजितदादांच्या मावशी सुषमा बाळासाहेब देशमुख या फुलंब्रीतील असल्याने, बालपणीच्या अनेक उन्हाळी सुट्ट्या दादांनी याच गावात घालवल्या होत्या. त्यांचे मावसभाऊ नितीन देशमुख सांगतात की, "दादा कितीही मोठे झाले किंवा व्यस्त असले, तरी छत्रपती संभाजीनगरला आले की मावशीला भेटल्याशिवाय जात नसत. राजकारणातील कठोरपणा बाजूला सारून ते इथे केवळ एक 'भाचा' म्हणून वावरत असत."
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
कोरोनातील 'ती' शेवटची भेट
कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही दादांनी आपल्या मावशीची भेट घेण्यासाठी वेळ काढला होता. त्यावेळी त्यांनी सुषमा देशमुख यांच्याशी दोन तास मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. दुर्दैवाने त्यानंतर काही दिवसांतच मावशीचे निधन झाले. मावशीच्या जाण्याने हळवे झालेले दादा आज स्वतःच अनंत प्रवासाला निघून गेल्याने या नात्याचा एक मोठा दुवा कायमचा तुटला आहे.
विकासाचा ध्यास
अजितदादांनी फुलंब्रीच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला. पाथ्री, निधोना परिसरातील ३३ केव्ही विद्युत केंद्राचा प्रश्न असो किंवा आर्थिक अडचणीत सापडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना असो; दादांनी नेहमीच मदतीचा हात दिला. साखर कारखान्याला अवसानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका फुलंब्रीतील शेतकरी कधीही विसरणार नाहीत.