'विकासासोबत पर्यावरणही जपा!'; झाडांशी संवाद साधणारा महाराष्ट्राचा संवेदनशील 'दादा' हरपला
By संतोष हिरेमठ | Updated: January 29, 2026 14:07 IST2026-01-29T14:06:38+5:302026-01-29T14:07:44+5:30
Ajit Pawar Death: "विदेशी नको, सावली देणारी देशी झाडे लावा!" सडेतोड बोलणाऱ्या दादांचा 'वृक्षप्रेमी' अवतार

'विकासासोबत पर्यावरणही जपा!'; झाडांशी संवाद साधणारा महाराष्ट्राचा संवेदनशील 'दादा' हरपला
छत्रपती संभाजीनगर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख कडक प्रशासक, थेट बोलणारा नेता अशी दिली जाते. पण, जेव्हा ते झाडांच्या सांन्निध्यात उभे राहत असत, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, अधिक संवेदनशील पैलू समोर येत असे. झाडांकडे पाहण्याची त्यांची नजर, वृक्षांविषयीचे ज्ञान आणि पर्यावरणाबाबतची ठाम भूमिका, हे सगळे त्यांच्या वृक्षप्रेमाची साक्ष देत होते. छत्रपती संभाजीनगरात गतवर्षी मे महिन्यातील दौऱ्यातही त्यांच्यातील झाडांशी संवाद साधणारा एक संवेदनशील माणूस पहायला मिळाला होता.
पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ प्रकल्पास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ मे २०२५ रोजी भेट देऊन भर उन्हात छत्री घेऊन पाऊण तास झाडांची पाहणी केली होती. यावेळी झाडांची पाहणी करताना ते फक्त पाहत नव्हते, तर समोर दिसणाऱ्या एक-एक झाडाची नावे स्वत:हून सांगत होते. अगदी आजच्या पिढीलाही माहीत नसलेल्या दुर्मीळ झाडांची नावे ते अगदी सहजपणे सांगत होते. ‘झाडे लावताना देशी झाडांना प्राधान्य द्या’ असे आवर्जून सांगताना मोहगनी, नांद्रुक विविध झाडांची नावेही घेतली.
‘मराठवाड्यात खूप झाडे, पण...’
मराठवाड्यात खूप झाडे आहेत. परंतु, कोणाला काही माहीत नाही, त्यात कुणाला इंटरेस्ट नाही. ‘मला महामंडळ द्या, मला आमदारकी द्या, मला मंत्री करा, मला संत्री करा’, यात रस असल्याचा टोला अजित पवार यांनी पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ची पाहणी करताना लगावला होता.
झाडांची सर्व माहिती
अजित पवार यांनी गतवर्षी मे महिन्यात पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना झाडांविषयी असलेली माहिती प्रत्ययास आली. भर उन्हात छत्री घेऊन त्यांनी झाडांची पाहणी केली. ही भेट कायम स्मरणात राहील.
- प्रशांत गिरे, संस्थापक अध्यक्ष, जनसहयोग सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा
नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली होती. ‘तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं हीदेखील काळाची गरज आहे, पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे,’ अशी भूमिका अजित पवार यांनी एक्सवर मांडली होती.
पानगळ कमी होणारी झाडे...
पिंपरी चिंचवड येथे २६ एप्रिल २०२५ रोजी पोलिस प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमातही अजित पवार यांचे वृक्षप्रेम पहायला मिळाले होते. ‘लोकांना सावली देणारी, पानगळ कमी होणारी, पण देशी झाडे लावा, लिंब, कुसूम, मोहगनी अशी झाडे लावा’ असे ते म्हणाले होते.