प्रेमविवाहनंतर सासरच्यांनी छळले, माहेरच्यांनी साथ सोडली; उड्डाणपुलावरून विवाहितेची उडी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:11 IST2025-06-19T12:04:07+5:302025-06-19T12:11:18+5:30
विवाहितेचा उड्डाणपुलावरून जीवन संपविण्याचा प्रयत्न, प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचविले प्राण

प्रेमविवाहनंतर सासरच्यांनी छळले, माहेरच्यांनी साथ सोडली; उड्डाणपुलावरून विवाहितेची उडी...
छत्रपती संभाजीनगर : प्रेमात सुखी संसाराच्या आणाभाका घेत आकांक्षा (नाव बदलले आहे)ने प्रियकरासोबत लग्न केेले. मात्र, काही दिवसांत सासरच्यांकडून छळ सुरू झाला. तिच्या सततच्या तक्रारीला कंटाळून माहेरच्यांनी साथ सोडली. अखेर, एकट्या पडलेल्या २७ वर्षीय आकांक्षाने बुधवारी दुपारी एक वाजता भगवान महावीर चौकातील (बाबा चौक) उड्डाणपुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला.
आकांक्षाने चार वर्षांपूर्वी हसनाबादमधील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच नवरा आणि सासरकडून तिला मानसिक त्रास दिला जाऊ लागला. सतत मारहाण, वाद घालून टोमणे मारले जात होते. सासरच्यांच्या या वागणुकीला पतीकडून मिळणारी साथ आकांक्षाला असह्य झाली होती. अनेकदा तिने मदतीसाठी माहेरी धाव घेतली. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही.
दरम्यान, पतीने मुलाला स्वत:कडे ठेवत आकांक्षाशी संवाद कमी केला. त्यामुळे आकांक्षा अधिकच तणावाखाली गेली. त्रास असह्य झाल्याने बुधवारी दुपारी थेट महावीर चौकातील उड्डाणपुल गाठत तेथून खाली उडी मारली. या घटनेत तिच्या डोके, हात व पायांना गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.