औरंगाबादमध्ये अपघातात २८ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:14+5:302021-01-16T04:07:14+5:30
औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी ...
औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.
वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला होता. राज्यात सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढल्याने त्यात दररोज अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येत होती. याच परिस्थितीला औरंगाबादला सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याकाठी ८ हजार, तर दररोज २५१ वाहने रस्त्यावर येतात. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाणही अधिक आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या सगळ्यात वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. २०१९ मध्ये वाढलेले अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन राज्य रस्ता सुरक्षा समितीने तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरटीओ कार्यालय, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून अपघातांचे प्रमाण घटल्याने आकडेवारीवरून समोर आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्याने जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या. यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगीच्या मुख्य सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.
---
असे घटले अपघातांचे प्रमाण
२०१९
एकूण अपघात - ५६०
एकूण मृत्यू -१९९
एकूण जखमी -४३४
---
२०२०
एकूण अपघात - ४०६
एकूण मृत्यू -१३६
एकूण जखमी - २९४
----
लाॅकडाऊनचा फायदा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी लाॅकडाऊन पाळण्यात आला. याचा परिणाम रस्त्यावरील रहदारीवर झाला. रहदारी घटलेली असल्याने अपघातांचे प्रमाणही घटले. मृत्यूचे प्रमाण ३२ टक्क्यांनी, तर जखमी होण्याचे प्रमाणही ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे.