न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे सामाजिक प्रश्नांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते: सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:38 IST2025-06-27T13:34:58+5:302025-06-27T13:38:12+5:30

समता, बंधुता व सामाजिक न्यायाची जपणूक केल्याने हा बहुमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी छत्रपती संभाजीनगरात सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या भावना

A judge should be one who mixes with society, through which social issues can be resolved through justice: Chief Justice Bhushan Gavai | न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे सामाजिक प्रश्नांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते: सरन्यायाधीश भूषण गवई

न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे सामाजिक प्रश्नांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते: सरन्यायाधीश भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर: एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन होते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते, असे ठाम मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे गुरुवारी रात्री व्यक्त केले.

औरंगाबाद खंडपीठ संघातर्फे एमजीएमच्या वकील रुख्मिणी सभागृहात आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. घटनेचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व माझे वडील रामचंद्र गवई यांच्या विचारांचा वारसा समता, बंधुता व सामाजिक न्याय यांची जपणूक करीत वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानेच देशाच्या सर्वाेच्च न्यायाधीशपदाचा बहुमान मिळाला. हे सतीचे वाण असून, ते निष्ठापूर्वक पालन करण्याचा प्रयत्न मी कसोशीने करतो, अशा भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराळे, न्या. ए.एस. चांदूरकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. नितीन सांबरे, न्या. विभा कंकणवाडी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल बी. कोंडे देशमुख आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई आणि सुविद्य पत्नी डाॅ. तेजस्विनी गवई, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश बोरूलकर व सचिव ॲड. रवींद्र गोरे यांचीही विशेष उपस्थिती हाेती.

सर्वोच्च न्यायालय सर्व न्यायमूर्तींचे
‘सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तींचेच असते. त्यामुळे निर्णय हा एकमतानेच व्हायला हवा. एकट्याने काम करता येत नाही. एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो, असे ठाम मत त्यांनी मांडले. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन हाेते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते.

‘लोकमत’चा लेख आणि फोन...
या सत्कारानिमित्त निवृत्त न्या. पुखराज बोरा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करून सरन्यायाधीश गवई म्हणाले की, ‘मी हा लेख वाचला. लेख वाचून त्यांना फोन करून लेख चांगला झाल्याचे सांगितले. त्यांनी या लेखाबद्दल दोनदा आपल्या भाषणात उल्लेख केला. अनेक न्यायमूर्ती चांगले निकालपत्र लिहितात; पण त्यांचे कुणी अभिनंदन करीत नाही; परंतु नाशिक येथे प्रधान न्यायाधीश असताना न्या. बोरा यांनी दिलेल्या चांगल्या निकालपत्राबद्दल मी फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते, तसे आजही केले’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोल्हापूरसाठी मी नेहमी पाठिंबा दिला
‘कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे, ही मागणी जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले. त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात, ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक आहेत’, असे गवई यांनी नमूद केले.

न्यायाधीश निवडीत गुणवत्ता महत्त्वाची
गवई कोलेजियमबाबत म्हणाले की, ‘आम्ही नेहमीच गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिला आहे. उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी, हे कधीही निकष ठरत नाहीत. केवळ त्यांची पात्रता, ज्ञान व नीतिमत्ता हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’

Web Title: A judge should be one who mixes with society, through which social issues can be resolved through justice: Chief Justice Bhushan Gavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.