मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणे भुईसपाट; ८०० जणांचा रोजगार बुडाला, कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:49 IST2025-06-21T12:48:23+5:302025-06-21T12:49:39+5:30
२००० नंतर हळूहळू वाढत गेली अतिक्रमणे; सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणे भुईसपाट; ८०० जणांचा रोजगार बुडाला, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागात महापालिकेने २२९ अतिक्रमणे भुईसपाट केली. यामध्ये २१५ दुकाने, हाॅटेल, गॅरेज, चायनिज सेंटर, लघु उघोग, वेल्डींग, चहा-नाश्ता सेंटर आदी अनेक प्रकारची दुकाने होती. दुकाने पाडण्यात आल्यानंतर किमान ८०० पेक्षा अधिक जणांचा रोजगार बुडाला. प्रत्येक दुकानावर किमान ४ जण कामाला होते. काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त कामगार होते.
अशी वाढली अतिक्रमणे
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या पाठीमागे १९९५ ते २००० पर्यंत दाट लाेकवसाहती निर्माण झाल्या. एसटी वर्कशॉपसमोरही अशीच परिस्थिती होती. या भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध मूलभूत सोयी सुविधांची गरज भासू लागली. त्यामुळे मुकुंदवाडी स्मशानभूमीपासून एसटी वर्कशॉपपर्यंत आणि पोलिस ठाण्यापासून साेहम मोटर्स कॉर्नरपर्यंत अतिक्रमणे हळूहळू वाढत गेली. या अतिक्रमणांना राजकीय वरदहस्त होते. महापालिकेत चांगला वरदहस्त असल्याने पत्र्याचे शेड मारून दुकाने थाटण्यात येऊ लागली. या अतिक्रमणांनी सर्व्हिस रोड बघितला नाही, सामासिक अंतराचेही भान ठेवले नाही. २५ वर्षांपासून अतिक्रमित दुकानांमध्ये राजरोस व्यवसाय सुरू होता.
कोट्यवधींचे नुकसान
शुक्रवारी २२९ अतिक्रमणे पाडण्यात आली. यातील बहुतांश दुकानांमधील सामानही व्यापाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज या भागातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.
दुचाकी वाहने जप्त
मुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियम येथे नेल्या. त्यानंतर त्यांचे शेड जमीनदोस्त केले. जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचा सायंकाळपर्यंत आटापिटा सुरू होता.
जिकडे तिकडे मलबा
अतिक्रमणे पाडल्यानंतर दुकानांच्या शेड, पत्र्याचा मलबा पडून होता. व्यापाऱ्यांनी हा मलबा उचलण्यासाठी दुपारनंतर प्रयत्न सुरू केले. कटरच्या साह्याने तुकडे करून मलबा जमा करण्यात येत होता.