पोंभुर्णा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार बोकाळला
By admin | Published: June 8, 2014 11:49 PM2014-06-08T23:49:05+5:302014-06-08T23:49:05+5:30
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करून सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी
देवाडा (खुर्द) : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करून सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामात मृत व्यक्तीच्या नावावर रक्कम अदा करण्यात आली आहे, तर कामावर उपस्थित नसलेल्या मजुरांचे नाव मस्टरवर घेऊन त्यांच्या खात्यावर रक्कम काढण्यात येऊन रकमेचा गैरवापर करण्यात आला आहे. आठवडी बाजाराचा लिलाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी दराने करण्यात आला. ठेकेदाराशी संगनमत करून सदर प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायती अंतर्गत नाल्यांचा उपसा करण्यात आला. त्यात सदर कामाचे कंत्राट सरपंच व सचिवांनी आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला दिले असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये अधिकचे बिल काढून मजुरांचे नावे बोगस मस्टर भरण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय रकमेचा गैरवापर करण्यात आला आहे.
ग्रामसभेमध्ये चुकीचे ईतीवृत्त लिहून काही ग्रामस्थांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची चौकशी करण्यात यावी, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत १३ व्या वित्त आयोगातून मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक पाचचे बांधकाम करण्यापूर्वीच अंदाजपत्रकीय रक्कम उचल केली. मात्र अंगणवाडीचे काम अपूर्णावस्थेत असून सदर काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे.
पोंभूर्णा येथील शास्त्रीनगर वॉर्डामधील नळाचे लिकेज दुरुस्त न केल्यामुळे स्थानिक नागरिकांना तब्बल दोन महिने दूषित व घाणयुक्त पाण्याचा पुरवठा करण्यात आला. परिणामी स्थानिक वॉर्डात विविध आजारांसह डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने अनेक रुग्णांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागले.
या संपूर्ण अनागोंदी कारभारावर अंकुश लावण्याकरिता संबंधित प्रशासनाने त्वरित चौकशी करून विविध विकास कामात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा गावकर्यांकडून तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य ओमेश्वर पद्मगिरीवार, अशोक गेडाम, गणेश वासलवार, नंदू बुरांडे, रत्नमाला टेकाम, मंगला बोलीवार, विलास उरांडे एकूण सात सदस्य यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले आहे. (वार्ताहर)