लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अॅन्टिजन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. मंगळवारी चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा, चिमूर,पडोली व घुग्घुस येथे एकूण २५३ जणांची तपासणी केली असता सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. पोलीस, आरोग्य विभाग व नगरपंचायतच्या संयुक्त धडक मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर निघत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा व चिमूर तालुकास्थळी मंगळवारी कारवाई झाली. घुग्घुस ५७ व पडोली येथे ६७ जणांची चाचणी झाली. बल्लारपुरात सकाळी ८८ जणांची तपासणी केली असता पाचजण अहवाल पॉझिटिव्ह आढळले. राजुरा शहरात पंचायत समिती चौकात २८ जणांची झाली. चिमूर शहरात ५० नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्या सातही जणांना कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
पाच ठिकाणी झाली ॲन्टिजन चाचणी
- बल्लारपूर शहरात ही मोहीम तीन ठिकाणी राबविण्यात आली. ५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.- राजुरा शहरात पंचायत समिती चौकामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून एकाही व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आढळून आलेला नाही.- चिमूर शहरात बाजारपेठेलगत मुख्य रस्त्यावर ५० नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.- घुग्घूस येथे ५७ व पडोली येथे ५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला नाही.