गणेशोत्सवात नागरिकांनी शांतता राखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:48+5:30
गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी भाषणातून केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : समाजात अनेक जाती, धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव, मोहरम हे सण साजरे करताना इतर धार्मियांच्या भावना दुखावणार नाही. याविषयी प्रत्येक नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
येथील स्व. मदनगोपाल भय्या सभागृहात पोलीस उपविभाग ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या सभेत डॉ. रेड्डी बोलत होते. सभेला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, नायब तहसीलदार डॉ. निलेश खटके, उपकार्यकारी अभियंता लिखार, नगराध्यक्ष रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी नगराध्यक्ष अशोक भय्या यांच्यासह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, याबाबत पोलीस विभाग दक्ष असून सामाजिक तत्वावर विशेष नजर ठेवण्यात आली आहे.
गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी भाषणातून केले. संचालन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी मानले.
डिजेला परवानगी नाही
कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी देण्यात येणार नाही. ब्रह्मपुरी शहर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातून थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस अधीक्षकांसोबत थेट संवाद साधता येणार आहे.