ब्रह्मपुरीतील रस्त्यांवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:45+5:30
गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
रवी रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून शहरातील काही मुख्य चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीमुळे अपघातही वाढले आहे.
गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शहरातील शिवाजी चौक, सावरकर चौक, रेणुकामाता चौक, झांशी राणी चौक, सावरकर चौक, फाशी चौक, बाजार चौक, ख्रिस्तानंद चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, गुजरी वार्ड हे मुख्य चौक असून या ठिकाणीदेखील अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासनाला याचे काही देणेघेणे दिसत नाही. सदर मुख्य चौकांमधून दररोज शेकडो वाहने धावतात. परंतु रस्ते अरुंद असल्यामुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन नगरपालिका तथा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन सदर वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
पालिकेची मोहीम थंडबस्त्यात
काही वर्षांपूर्वी किंवा अधून-मधून नगरपालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असते. परंतु काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते. आता मागील काही वर्षांपासून पालिकेने अशी मोहीम हाती घेतली नाही. अतिक्रमणाबाबत आता ठोस पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.