शेतकऱ्यांना हवे नुकसान भरपाईसाठी ६८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:36+5:30
पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. सर्व १५ तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनामा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला. त्यानुसार ९७ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी विभागीय आयुक्तांच्या वतीने जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ६८ कोटींची मागणी केली आहे.
पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनामार्फत ३० आॅक्टोबरपासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांद्वावारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंतिम अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ९७ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
सहा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र ९७ हजार ८६२ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वरोरा, चिमूर, कोरपना, राजुरा, चंद्रपूर व सावली तालुक्यात झाल्याचे अंतिम अहवालात नमुद करण्यात आले. कापूस, सोयाबीन व भात उत्पादक शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पीक विम्यासाठी ११ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
खरीप हंगामातील पिकांचा विमा काढणाºया लाखो शेतकऱ्यांपैकी मंगळवारपर्यंत केवळ ११ हजार शेतकºयांनी विमा क्लेमसाठी विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले. नुकसानीचा पंचनामा करताना विमा कपंनीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही तर कृषी विभागाकडून केलेला पंचनामा विमा कंपनीला मान्य करावा लागेल, असा आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.