पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:01 IST2025-06-24T13:00:49+5:302025-06-24T13:01:40+5:30

नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या; जून महिन्यात १०० मीमीदेखील पाऊस नाही

Extremely dire situation in Marathwada including Vidarbha as rains turn their backs! | पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात यंदा मान्सून नेमक्या वेळेत दाखल झाला असून, कोकण, पुणे आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात १०० मिमीदेखील पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

विदर्भ व मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांचे पेरणी मोठे क्षेत्र आहे. मात्र, जून अखेरीस अपेक्षित पाऊस न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरून ठेवल्याने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता दर्शवली आहे.

मान्सून दिल्लीच्या दारी; दिवसभरासाठी येलो अलर्ट

मोसमी पाऊस अर्थात मान्सून दिल्लीपर्यंत पोहोचला असून, मंगळवारी (दि. २४) पाऊस राजधानी क्षेत्रात दाखल होऊ शकतो. दरम्यान, दिल्ली क्षेत्रात दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीतील बहुतांश भागांत मान्सूनच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल आहे. 

'स्कायमेट' या खासगी हवामानविषयक संस्थेनेही मंगळवारी दिल्लीत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोजक्या भागांत पाऊस झाला, तर राजस्थानमध्ये जयपूरसह काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतवगळता अन्य भागांत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.

'विदर्भाकडे सरकारने लक्ष द्यावे'

विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीही केल्या. आता मात्र विदर्भात दुष्काळसदृश स्थिती आहे. कापसाचे बियाणे पेरल्यावर त्याला अंकुर आले आणि ते फस्त करण्याचे काम 'वाणी' नावाची कीड करत आहे.

 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे गट नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आले आहे. ३५ टक्के पेक्षा सोयाबीनचा पेरा झाला नाही. तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे.

Web Title: Extremely dire situation in Marathwada including Vidarbha as rains turn their backs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.