कारधातील ब्रिटीशकालीन वैनगंगा पुलावरील वाहतूक कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:52+5:30
वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीवरील ९० वर्षापुर्वीच्या ब्रिटीशकालीन पुलावरुन आजही जीव मुठीत घेवून नागरिक प्रवास करीत आहेत. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जुना पुल पाण्याखाली दोनवेळा बुडला होता. यापुर्वीही अनेकदा पुराचे पाणी पुलावरून गेले आहे. सध्या पाण्याची पातळी अगदी जवळ असूनही अशास्थितीत पुलावरून शेकडो वाहनांची रहदारी सुरु आहे.
वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरु आहे. कारधा व परिसरातील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने याच पुलाचा वापर करीत असतात. आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईप टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतू स्थानिकांना आवागमन करण्यास जुना पुल सोयीचा होत असल्याने लोखंडी पाईप काढण्यात आले. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद असली तरी पादचारी व दुचाकीची वाहतुक सुरु आहे.
जिल्हाधिकाºयांच्या सुचनेकडे दुर्लक्ष तिन वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांनी निर्बंध घातल्यानंतरही वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुधडी भरून असून लहान पुलावरून जिव मुठीत घेवून धाकधुकीतच प्रवास करावा लागतो. तरीही वाहनचालक न जुमानता जीवघेणा प्रवास करतांना दिसत आहेत. याप्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सकाळी व सायंकाळी या पुलावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी नदीत वाहने कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरूंद आहे.
पुलाची कालमर्यादा संपली
गोसे प्रकल्प झाल्यानंतर पाण्याची पातळी पुलापर्यंत राहते. पावसाळयात तर वैनगंगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतूकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने भरधाव जातात. यावर्षी पावसाळयात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत जिवघेणा प्रवास सुरु आहे.