संरक्षण जाळीअभावी वृक्ष झाली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:55+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा जवळपास विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनाबाबत सामाजिक वनिकरण विभागाचे उदासीन धोरण असल्याने आजतागायत लाखो रुपये खर्च करण्यात आलेल्या झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : सामाजिक वनिकरण विभागाचेवतीने २०१८ - १९ या वर्षात शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने सदर झाडे नष्ट होत आहेत. या प्रकाराकडे सामाजिक वनिकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे .
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा जवळपास विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनाबाबत सामाजिक वनिकरण विभागाचे उदासीन धोरण असल्याने आजतागायत लाखो रुपये खर्च करण्यात आलेल्या झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली नाही. त्यामुळे सदर झाडे मोकाट जनावरांच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले असताना सामाजिक वनिकरण विभागाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष दिसून येत आहे. शासनाचा वृक्ष लागवडीसाठी खर्च झालेला लाखो रूपयांचा निधी व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ मोजकीच झाडे सुस्थितीत असून, इतर प्रजातींची झाडे मात्र संरक्षण जाळीअभावी वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले आहे. सध्यस्थितीत अनेक खड्डे झाडाअभावी रिकामी, तर काही झाडे योग्य संगोपनाअभावी सुकली आहेत. तर काही खड्डयात वाळलेल्या काड्या उभ्या दिसून येत आहे.
या कामावर देखरेख करणारे सामाजिक वनिकरण विभागाच्या कर्मचारी वर्गावर वरिष्ठाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षलागवड योजनेचे तीनतेरा जजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबत सामाजिक वनिकरण विभागाने माहिती फलक लावला नसल्याने सामाजिक वनिकरण विभागाच्या कार्यप्रणाली बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतांना उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक वनिकरण विभागाचे वतीने रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून सामाजिक वनिकरण विभागाच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे होत आहे दुर्लक्ष
महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवड मोहीम राबविली. मात्र वृक्षांच्या देखभाल दुरुस्तीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने बोटावर मोजण्याइतकेच वृक्ष जीवंत असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले असून त्याची चौकशी झाल्यास पितळ उघडे पडेल.