४० वर्षांच्या लढ्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:39+5:30
अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान व भरभराटीसाठी ...
अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान व भरभराटीसाठी भंडारा व चंद्रपूर जिल्हा कमी अंतराने जोडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या ४० वषार्पासून सामुहिक लढा सुरु केलेला होता. वैनगंगा नदीवरील ईटान - कोलारी दरम्यान पुलाची प्रसिध्द झालेली निविदा पाहून लढ्याच्या शिलेदारांनी हर्षोल्लास व्यक्त केला.
‘लोकमत’ ने ईटान - कोलारी दरम्यान पूल व्हावा,या वृत्ताला प्राधान्य दिले होते. हे विशेषत: भंडारा व चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाचे अंतर पुलामुळे ५० कि. मी. ने कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची पैसा व वेळेची बचत होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर तालुका मुख्यालयापासुन १५ कि. मी. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व नागभिड तालुका मुख्यालयापासुन तेवढ्याच अंतरावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. ईटान - कोलारी दरम्यान हल्ली सुरु असलेल्या धोकादायक डोंग्याचे प्रवासाला पुलामुळे विराम मिळणार आहे.
शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान होण्यासाठी पुल मैलाचा दगड ठरणार आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध जलाशय, इटियाडोह प्रकल्प, उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य, गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, शोधग्राम, आनंदवन, हेमलकसा हे सर्व कमी अंतराने जोडले जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी ईटान - कोलारीदरम्यान होऊ घातलेला पुल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ईटान - कोलारी सेतू निर्माण समितीने हर्षोल्लास व्यक्त केला आहे.