स्वप्नांच्या भरारीआधीच लाटांनी हिरावलं ‘मयुरी’च आयुष्य; चेन्नईत दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:37 IST2026-02-22T19:36:51+5:302026-02-22T19:37:20+5:30
अवघ्या २५ दिवसांपूर्वी आयटी क्षेत्रात इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेलेली मयुरी ही नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. मात्र नियतीने क्रूर वळण घेतले...

स्वप्नांच्या भरारीआधीच लाटांनी हिरावलं ‘मयुरी’च आयुष्य; चेन्नईत दुर्घटना
वरठी (भंडारा) : आईच्या डोळ्यांतल्या स्वप्नांचा उजेड, वडिलांच्या कष्टांना आधार देणारी जिद्द आणि भावाच्या भविष्यासाठी उभी असलेली सावली, अशी ही वरठी येथील मयुरी हरीश्चंद्र चौधरी. आयुष्याच्या नव्या उंबरठ्यावर उभी राहून यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत असतानाच, नियतीने एका निर्दयी लाटेत तिची स्वप्ने हिरावून घेतली. काही क्षणांचा आनंद शोधायला गेलेली ही लेक आता कुटुंबाला सोडून कधी न परत येण्यासाठी कायमची निघून गेली.
अवघ्या २५ दिवसांपूर्वी आयटी क्षेत्रात इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेलेली मयुरी ही नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. मात्र नियतीने क्रूर वळण घेतले. शनिवारी सुट्टी असल्याने सहकाऱ्यांसह चेन्नई–पुडुचेरी मार्गावरील समुद्रकिनारी ती फिरण्यासाठी गेली होती. समुद्र शांत दिसत असला तरी अचानक उसळलेल्या १५ ते २० फूट उंच लाटांनी क्षणात सर्व काही बदलले. सेल्फी घेत असतानाच लाटेने तिला समुद्रात खेचले.
मयुरीने दहावीपर्यंतचे शिक्षण भंडाऱ्यात पूर्ण केले आणि पुढे आयटी अभियांत्रिकी शिक्षणासाठी नांदेड गाठले. तेथील श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली. नुकतीच तीची एका नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. वडील र्बींकेचे सेवा केंद्र चालवतात, आई गृहिणी, तर भाऊ शिक्षण घेत आहे. घरातील आधारस्तंभ मानली जाणारी मयुरी अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुर्घटनेची बातमी वरठी गावात कळताच शोककळा पसरली. वडील कोणताही विचार न करता ॲम्बुलन्सची व्यवस्था करून चेन्नईकडे रवाना झाले. आईला धक्का बसू नये म्हणून तिला केवळ जखमी असल्याचे सांगण्यात आले. भाऊ आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी बहिणीच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत आहे.