जिल्ह्यात तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:53+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यात साकोली तालुक्यातील २७ व्यक्तींचा समावेश असून येथील कोरोनाबाधीतांची संख्या ४९ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी तर तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. एकट्या साकोली तालुक्यात २७ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीतांची संख्या आता १५५ वर पोहोचली आहे. तर ७९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. महानगरातून आलेले आणि अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यात साकोली तालुक्यातील २७ व्यक्तींचा समावेश असून येथील कोरोनाबाधीतांची संख्या ४९ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण साकोलीतच आहेत. त्या खालोखाल लाखनी तालुक्यात गुरुवारी ११ पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले. येथील संख्या आता २६ झाली आहे. तुमसर तालुक्यात गुरुवारी सहा रुग्ण आढळल्याने एकुण संख्या १७ वर पोहोचली आहे. भंडारा तालुक्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एकूण संख्या २५ झाली आहे. पवनी तालुक्यात एक रुग्ण आढळल्याने येथील संख्या १६ वर पोहोचली आहे. लाखांदूर आणि तुमसरमध्ये गुरुवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र लाखांदूरमध्ये १५ तर मोहाडी सात रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यात मध्यप्रदेश, गोवा, बिहार, कुवेद, बिड, हैद्राबाद येथून आलेली प्रत्येकी एक व्यक्ती आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नऊ व्यक्ती, नागपूर येथून दोन व्यक्ती, पुणे आणि बंगलोरू येथून तीन व्यक्ती अशा २५ जणांचे नमुने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
सर्वांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डात ३२ व्यक्ती दाखल असून कोविड केअर सेंटरमध्ये ४४९ व्यक्तींवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ४९२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४६२२ व्यकतींच्या घशातील नमुने निगेटिव्ह आले आहे. तर १५२ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अतिजोखमीचे २४ व्यक्ती पॉझिटिव्ह
जिल्ह्यामध्ये अतिजोखीम (हाय रिस्क) संपर्कातील २४ व्यक्तींच्या घशाचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे नमुने गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्र श्वासदाहच्या १६७ व्यक्ती दाखल असून त्यापैकी १६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. अतिजोखीम संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकात खळबळ उडाली आहे.
१३० पुरुष तर १५ महिला बाधित
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून त्यात १३० पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात १९ पुरुष आणि सहा महिला मोहाडीत चार पुरुष तीन महिला, तुमसरमध्ये ११ पुरुष पाच महिला, पवनीत १६ पुरुष, एक महिला, लाखनीत २३ पुरुष चार महिला, साकोलीत ४२ पुरुष आणि सहा महिला तर लाखांदूरमध्ये १५ पुरुष कोरोनाबाधीत आढळून आले. येथे एकही महिला कोरोनाबाधीत आढळली नाही.
साकोलीत खळबळ
एकाच दिवशी साकोलीत २७ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ४९ रुग्ण साकोली येथीलच आहेत. महानगरातून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे. गुरुवारी आढळून आलेले सर्व २७ पॉझिटिव्ह व्यक्ती क्वारंटाईन सेंटरमधील आहेत.
लाखनी शहरात कन्टेन्मेंट झोन
लाखनी : जिल्हा प्रशासनाने लाखनी शहराच्या हद्दीतील काही क्षेत्र कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. यात पोस्टआॅफीसजवळील रतिराम गायधने यांच्या घरापासून ओम खरवडे यांच्या घरापर्यंत, गायधने यांच्या घरापासून केशव रामटेके यांच्या घरापर्यंतचा भाग तसेच उत्तरेकडे भोजराम लिचडे व दक्षीणेकडे इस्माईल शेख ते उपकोषागार कार्यालयापर्यंत भागाचा कन्टेन्मेंट झोनमध्ये समावेश आहे. याशिवाय रविंद्र रामटेके यांच्या घरापासून ते उत्तर भागातील ताराचंद कराडे यांचे घर ते तुळशाबाई वंजारी व प्रेमलाल निर्वाण यांच्या घरापर्यंतचा भाग कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे. हाय रिस्कमध्ये आढळलेल्या रुग्णांवर निगराणी ठेवली जात आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.