आखाती युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या निर्यातीला ब्रेक; शेतकऱ्यांना जबर फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:19 IST2026-03-06T13:15:30+5:302026-03-06T13:19:21+5:30
Bhandara : भेंडी, मिरची व कारल्याची निर्यात थांबली, १०० टन आवक २० टन भाजीपाला थांबला

Gulf War halts vegetable exports in Bhandara district; Farmers hit hard
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (भंडारा) : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या निर्यातीला जबर फटका बसला. भाजीपाल्यात मुख्यता भेंडी, कारले व मिरची आदीची नागपूर येथून विमानमार्गे निर्यात बंद पडली असून त्यामुळे बीटीबी येथे दररोज २० टन भाजीपाल्याची निर्यात थांबली आहे.
खुल्या अर्थव्यवस्थेत जागतिक स्तरावर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना युद्धाचा अप्रत्यक्ष फटका सहन करावा लागत आहे. समुद्रमार्गे व हवाईमार्गे प्रभावित ठरल्याने भारतातून निर्यात बंद पडली आहे. भंडारा येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाजीपाल्याची निर्यात सुरू असताना अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे बीटीबी भाजीमंडी प्रभावित झाली.
आवक कायमच
जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकरी नित्यनेमाने ठरलेल्या कालावधीनुसार निर्यातक्षम भाजीपाला उत्पादित करीत आहे. कोणत्या महिन्यात कोणत्या भाज्यांची गरज असून अधिक पैसे मिळतील त्याच भाज्यांची लागवड जिल्ह्यात होत आहे.
निर्यात धोरणामुळे शेतकरी हुशार झाला आहे. मात्र अचानक उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात थांबली असून दरात घसरण झाली आहे.
"निर्यात थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सुद्धा काही ठिकाणी दंगलीमुळे ट्रान्सपोर्ट प्रभावित ठरले आहेत. दररोज २० टन भाजीपाला युद्धामुळे थांबला आहे."
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी, भंडारा
"निर्यात बंद होणे आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. जेमतेम निर्यातक्षम भाजीपाला सुरू झाला आहे. निर्यात बंद पडल्यामुळे भाव (दर) सुद्धा पडले आहेत. भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला सोबत घेत निर्यातीकरिता इतर देशात प्रयत्न करावे."
- नारायण धरमशहारे, भेंडी उत्पादक खेडेपार, तालुका लाखनी