Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:18 IST2025-06-20T11:17:59+5:302025-06-20T11:18:25+5:30
Yogini Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उरले अवघे १५ दिवस, प्रत्यक्ष वारीत जाता आले नाही, निदान 'हे' स्तोत्र ऐकून, म्हणून पुण्यासंचय करूया.

Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. म्हणजेच आषाढी एकादशीला १५ दिवस उरले आहेत. ठिकठिकाणहून वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघाले आहेत. या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका, तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक वेळ ठरवून न चुकता दिलेले स्तोत्र म्हणा किंवा ऐका! या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी अनेक लाभ होतात. यंदा योगिनी एकादशी(Yogini Ekadashi 2025) दोन दिवसात विभागून आली आहे. २१ जून रोजी रात्री ११. १० मिनिटांनी योगिनी एकादशी सुरू होणार असल्याने ती स्मार्त एकादशी म्हटली आहे, तर ही तिथी रविवार २२ जूनचा सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवारी योगिनी तिथी ग्राह्य धरली जाणार आहे. जिला भागवत एकादशीदेखील म्हणतात. तिथून पुढे १५ दिवस आपल्याला कोणती उपासना करायची आहे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात, त्याची नियमावली काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी एकादशी अशी योगिनी एकादशीची ओळख आहे. हे व्रत करण्यासाठी उपास तर करायचा असतोच, शिवाय त्याला उपासनेचीही जोड हवी. एकादशीच्या उपासनेसाठी स्तोत्र सांगितले आहे ते म्हणजे विष्णू सहस्त्र नाम! ते केवळ एकाद्शीपुरते म्हणायचे, ऐकायचे नसून ते रोज म्हटले पाहिजे तरच त्याचा लाभ होईल. कसा तेही जाणून घ्या.
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो.
शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?
त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते.
महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो.
Ashadhi Wari 2025: गजानन महाराजांची शिकवण आणि वारीतली एक परंपरा यात आहे साम्य!
विष्णुसहस्रनामाचे फायदे :
>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो.
>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात.
>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.
>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो.
विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?
कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. तरच, स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात.
>> स्तोत्र पाठ नसेल, तर युट्यूबवर विष्णुसहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवेलागण झाली, की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे. विशेषत: दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेले विष्णुसहस्रनाम मंत्रमुग्ध करते.
>> स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले, तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे. म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते.
>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे.
>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.
आपणही योगिनी एकादशीच्या सुमुहूर्तावर या स्तोत्राचे पठण सुरू करूया!