Did you know: चूक करू नका! 'ध्वजारोहण' आणि 'झेंडा फडकवणे' यातला हा फरक तुम्हाला माहीत असायलाच हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:06 IST2026-01-24T13:04:25+5:302026-01-24T13:06:06+5:30
Republic Day 2026: २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, कॉलेज, सोसायटीत ध्वजवंदन आयोजित केले जाते, त्यादृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची!

Did you know: चूक करू नका! 'ध्वजारोहण' आणि 'झेंडा फडकवणे' यातला हा फरक तुम्हाला माहीत असायलाच हवा
प्रजासत्ताक दिन(Republic Day 2026) असो वा स्वातंत्र्य दिन, आपल्या तिरंग्याला डौलाने फडकताना पाहणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या दोन्ही दिवशी ध्वज उभारण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते? तांत्रिक भाषेत सांगायचे तर, एका दिवशी 'ध्वजारोहण' केले जाते, तर दुसऱ्या दिवशी 'झेंडा फडकवला' जातो.
यंदाच्या २६ जानेवारी २०२६ च्या निमित्ताने यातील नेमका फरक आणि त्यामागील रंजक कारणे जाणून घेऊया.
१. ध्वजारोहण (Flag Hoisting) - १५ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान 'ध्वजारोहण' करतात.
पद्धत: यावेळी राष्ट्रध्वज खांबाच्या खालच्या बाजूला बांधलेला असतो. पंतप्रधान दोरी ओढून तो ध्वज खालून वर नेतात आणि मग तो फडकवला जातो.
अर्थ: ध्वज खालून वर नेण्याची ही प्रक्रिया ब्रिटीश राजवटीचा अंत आणि नवीन स्वतंत्र भारताच्या उदयाचे प्रतीक आहे. याला इंग्रजीत 'Flag Hoisting' म्हणतात.
२. झेंडा फडकवणे (Flag Unfurling) - २६ जानेवारी
प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) कर्तव्य पथावर देशाचे राष्ट्रपती 'झेंडा फडकवतात'.
पद्धत: यावेळी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला गुंडाळून बांधलेला असतो. राष्ट्रपती केवळ दोरी ओढतात आणि तो फडकवला जातो.
अर्थ: भारत आधीच स्वतंत्र झाला असल्यामुळे ध्वज वर नेण्याची गरज नसते, तर केवळ तो उघडून फडकवला जातो. ही प्रक्रिया आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि प्रजासत्ताक राष्ट्राचा गौरव दर्शवते. याला इंग्रजीत 'Flag Unfurling' म्हणतात.
३. मान कोणाचा? (राष्ट्रपती की पंतप्रधान)
१५ ऑगस्ट: देश स्वतंत्र झाला तेव्हा संविधान अमलात आले नव्हते आणि राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते, त्यामुळे देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान ध्वजारोहण करतात.
२६ जानेवारी: हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीचा आहे. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्याने, प्रजासत्ताक दिनी त्यांचा हस्ते हा सोहळा पार पडतो.
ध्वज संहितेचे पालन अनिवार्य
तिरंगा हा आपल्या देशाचा सन्मान आहे. ध्वज कसा गुंडाळावा, त्याची घडी कशी घालावी आणि तो कसा उतरवावा याचे कडक नियम 'भारतीय ध्वज संहितेत' दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.