Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:00 IST2025-10-15T07:00:00+5:302025-10-15T07:00:02+5:30
Rama Ekadashi 2025: रमा एकादशी ते भाऊबीज हा दीपोत्सव आनंदाने पार पडावा यासाठी विष्णु कृपा महत्त्वाची,म्हणून दिलेले पाच श्लोक त्या दिवशी अवश्य म्हणा!

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!
शहरात दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने केली जात असली तरी शास्त्रानुसार दिवाळी(Diwali 2025) सुरू होते ती रमा एकादशीपासून! त्यानंतर वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशी उत्सवाची रेलचेल असते. म्हणून दिवाळीला सणांची सम्राज्ञी म्हणतात. यंदा १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी(Rama Ekadashi 2025) आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस(Vasu Baras 2025) आहे. तिथून सुरू होणार्या आनंद पर्वाची सुरुवात भगवान विष्णूंच्या उपासनेने करूया.
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् ,
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् |
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ,
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ||
अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् |
करोमि यद्यत् सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||
आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू: प्रचोदयात।।
याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.
'ओम नमो भगवते वासुदेवाय'
सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. जपाची एक वेळ ठरवून रोज त्याचवेळी नित्य उपासना केली, तर ती अधिक फलदायी ठरते. 'श्रीराम जय राम जय जय राम', 'ओम नम: शिवाय' या मंत्रांप्रमाणे सदर मंत्राचा १०८ वेळा जप करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.