कोट्यवधी लोक आणि एकच देव! तुमची हाक त्याच्यापर्यंत कशी पोहोचते? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:27 IST2026-04-15T16:26:49+5:302026-04-15T16:27:45+5:30
देव एकाच वेळी कोट्यवधी लोकांच्या मनातील हाक कशी ऐकतो? हा सर्वसामान्य मनाला पडणारा प्रश्न आणि त्यावर प्रेमानंद महाराजांचे उत्तर.

कोट्यवधी लोक आणि एकच देव! तुमची हाक त्याच्यापर्यंत कशी पोहोचते? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर
वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज त्यांच्या साध्या, सोप्या आणि तर्कशुद्ध उत्तरांसाठी ओळखले जातात. अनेकदा भक्तांच्या मनात शंका असते की, या जगात कोट्यवधी लोक राहतात, मग एकच देव या सर्वांचे गाऱ्हाणे एकाच वेळी कसे काय ऐकू शकतो? या प्रश्नाचे प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आणि डोळे उघडणारे आहे.
हे ही वाचा : Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, आपण जेव्हा देवाला साद घालतो, तेव्हा तो आपली हाक ऐकत असेल का? कारण आपल्यासारखेच इतर कोट्यवधी लोकही त्याच वेळी प्रार्थना करत असतात. एकाच ईश्वरासाठी हे सर्व कसं शक्य आहे? याच जिज्ञासेचे समाधान करताना प्रेमानंद महाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेत एक अद्भूत विचार मांडला आहे.
१. "इंद्रियानां मनश्चास्मि" – भगवंताचे अस्तित्व
महाराज सांगतात की, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, "इंद्रियानां मनश्चास्मि" म्हणजेच 'इंद्रियांमध्ये मन आहे आणि मनात मी आहे'. देव कोठे बाहेर नसून तो प्रत्येकाच्या मनात 'मन' बनूनच बसलेला आहे. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तो विचार देवापर्यंत पोहोचवण्याची गरज नसते, कारण तो विचार ज्या मनातून येतो, त्या मनाचा आधारच ईश्वर आहे.
२. आरशाचे सुंदर उदाहरण
या संकल्पनेला स्पष्ट करण्यासाठी महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिले. समजा, तुम्ही एका खोलीत एकटे उभे आहात, तर तुम्हाला फक्त स्वतःची एक प्रतिमा दिसेल. पण जर त्याच खोलीत तुम्ही लाखो आरसे लावले, तर तुम्हाला लाखो प्रतिमा दिसतील. जरी प्रतिमा लाखो असल्या तरी त्यामागची मूळ व्यक्ती तुम्ही एकच असता. तसेच, ईश्वर (सच्चिदानंद) एकच आहे, पण तो कोट्यवधी शरीरांमध्ये आरशातील प्रतिमेप्रमाणे वसलेला आहे.
हे ही वाचा : Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
३. मानवी मर्यादा विरुद्ध ईश्वरी सामर्थ्य
आपण मानवी बुद्धीने विचार करतो, म्हणून आपल्याला मर्यादा जाणवतात. आपली इंद्रिये 'प्राकृतिक' आहेत; आपण एकाच वेळी १०-२० आवाज ऐकले तरी गोंधळून जातो. पण ईश्वर हा 'परमात्मा' आहे. त्याची शक्ती अनंत आहे. महाराज म्हणतात की, देव केवळ कानानेच नाही, तर आपल्या बोटांनीही ऐकू शकतो, तो पायाने वास घेऊ शकतो आणि डोळ्यांनी खाऊ शकतो. ईश्वरासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
हे ही वाचा : स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
४. आपली हाक, त्याचे उत्तर
ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या मनातील विचार कोणालाही न सांगता ऐकू शकतो, त्याचप्रमाणे ईश्वरही आपल्या सर्वांची 'आत्मा' आणि 'बुद्धी' बनून बसलेला असल्यामुळे त्याला प्रत्येकाच्या मनातील स्पंदने स्पष्टपणे जाणवतात. तो केवळ ऐकत नाही, तर एकाच वेळी असंख्य लोकांना त्यांच्या कर्मानुसार उत्तरेही देतो.