मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:42 IST2026-01-28T11:38:33+5:302026-01-28T11:42:25+5:30
Ajit Pawar Passes Away: अजित दादा पवार यांच्या निधन वार्तेमुळे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे पुन्हा लक्षात आले असेल; याबाबत प्रेमानंद महाराजांनी केलेले मार्गदर्शन पाहू.

मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...
२८ जानेवारी २०२६ ची सकाळ उजाडली ती अजित दादा पवार यांची निधन वार्ता घेऊनच! या वार्तेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित दादांसारखा धुरंदर राजकारणी, उत्तम वक्ता आणि राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपत मदत करणारा नेता हरपला, यावर काय आणि कसे व्यक्त व्हावे हे कोणालाच उमगत नाही, अशी सद्यस्थिती आहे.
जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जाणार हे प्रत्येकाला माहीत आहेच, पण अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये, ही भावना याक्षणी प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी मृत्यूबाबत केलेले भाष्य स्मरते. ते म्हणतात...
मृत्यू कधी, कुठे आणि कसा घेरेल, हे कोणालाही सांगता येत नाही...
हे सत्य कितीही कठोर असले तरी ते अटळ आहे. माणूस प्रत्येक क्षणी मृत्यूच्या सावलीत जगत असतो, तरीही तो उद्याचे मोठे बेत आखत असतो. जेव्हा आपण प्रवासाला निघतो किंवा सकाळी घराबाहेर पडतो, तेव्हा आपण सुरक्षित परत येऊ की नाही, याची शाश्वती केवळ ईश्वराकडे असते. म्हणूनच, मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा ईश्वराचे स्मरण करून आपला भार त्याच्यावर सोपवणे हाच निश्चिंत राहण्याचा मार्ग आहे.
यासाठी महाराजांनी दैनंदिन जीवनात दोन महत्त्वाच्या प्रार्थना सांगितल्या आहेत
सकाळी: घराबाहेर पडताना 'सुरक्षा कवच'
दिवसाची सुरुवात करताना आणि घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी आपण ईश्वराच्या शरणात जाणे आवश्यक आहे. महाराजांच्या मते, सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्राचा ११ वेळा जप करावा:
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥
अर्थ: वासुदेवपुत्र श्रीकृष्ण, जे भक्तांचे सर्व क्लेश (दुःख) दूर करतात, अशा गोविंद स्वरूपातील परमात्म्याला मी शरण जात आहे. हा मंत्र ११ वेळा म्हटल्याने आपण दिवसभर ईश्वराच्या संरक्षणाखाली राहतो आणि मनातील भीती नाहीशी होते.
रात्री: शांत आणि सुरक्षित झोपेसाठी
दिवसभराची कामे आटोपून जेव्हा आपण अंथरुणावर जातो, तेव्हा उद्याची पहाट आपण पाहूच असे नाही. म्हणूनच, झोपण्यापूर्वी महाराजांनी एक विशेष श्लोक एकदा म्हणायला सांगितला आहे:
अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनम्।
देहि मे कृपया शम्भो त्वयि भक्तिमचञ्चलाम्॥
अर्थ: हे महादेवा, माझे मरण विनासायास (त्रास न होता) व्हावे, माझे जीवन लाचारीशिवाय व्यतीत व्हावे आणि तुमच्या चरणी माझी अढळ भक्ती राहो, इतकीच कृपा करा. हा श्लोक म्हणून ईश्वरावर सर्व भार सोपवून निश्चिंतपणे झोपावे.
प्रेमानंद महाराज सांगतात की, एकदा तुम्ही या दोन वेळा ईश्वराला शरण गेलात की, मग मृत्यूची चिंता तुमची नाही, ती ईश्वराची आहे. ज्याने जन्म दिला आहे, तोच योग्य वेळी योग्य ठिकाणी न्याय करेल. तुम्ही फक्त भक्तीत आणि कर्तव्यात मग्न राहा.