Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:00 IST2025-05-30T15:56:39+5:302025-05-30T16:00:11+5:30
Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग १

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
मुलगा असो अथवा मुलगी, वयात आले की घरात त्यांच्या विवाहाची चर्चा सुरु होते. 'तुझे कुठे ठरले असेल तर सांग बाबा', असा कालानुरूप असलेला आधुनिक सल्लाही दिला जातो. पिढी कुठलीही असो विवाह हा जिव्हाळ्याचा विषय संपूर्ण कुटुंबासाठी असतो. आज विवाहाचे संपूर्ण चित्र बदलले आहे , पण तरीही अजूनही मंगलष्टक ऐकताना आधुनिक नवरीच्या आधुनिक उच्च शिक्षित आईचे डोळे पाणावल्याशिवाय राहवत नाहीत ते तितकेच खरे आहे.
विवाहाचे सर्व विधी आणि त्या सर्व रूढी परंपरा अगदी रीतसर मुहूर्त काढण्यापासून ते पारंपारिक पेहराव, दागिने घालण्याकडे मुलींचा कल आजही दिसून येतो. विवाह म्हणजे आयुष्यातील मांगल्य आणि त्याचा सोहळा. त्यातील गोडवा लुटण्यासाठी दोन्हीही बाजूची कुटुंबे जोमाने तयारीला लागलेली असतात. अनेकदा आयुष्याच्या पुढील वळणावर हा आनंद द्विगुणीत होतो तर अनेकदा ह्या आनंदाला सौख्याला ओहोटी लागते. असंख्य करणातून नेमके कारण शोधणे कठीण होऊन जाते.
विवाह आणि त्यासंबंधी तत्सम गोष्टी जसे विवाह नेमका कधी कुणाशी करावा ? पत्रिका बघावी की नाही ? ज्योतिषीय सल्ला घ्यावा का? मंगळ आहे त्याचे काय? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पुढील काही लेखातून करायचा प्रयत्न आहे. आजचे वास्तव खूप वेगळे आहे आणि त्या सर्वाशी मिळते जुळते घेऊन पुढील आयुष्य जगण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते.
आजकाल मुला मुलींचे शिक्षण, नोकरी ह्यामुळे विवाहाचे वय पुढे जात आहे. आता मुलांसारख्या मुलीसुद्धा आपल्या करिअर च्या बाबत जागरूक आहेत , देशोविदेशात प्रवास करणाऱ्या, स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे कल असणार्या असल्यामुळे त्यांचीही मते महत्वाची आहेत .
पूर्वीचे चहापोहे आणि देण्याघेण्याच्या याद्या आज जरी इतिहासजमा झाल्या असल्या तरी त्या काळाच्या आड जाणे कितपत योग्य आहे ते येणारा काळच ठरवेल. प्रत्येक वेळी पूर्वीच्या लोकांना आणि त्यांच्या चालीरीतींना नावे ठेवून चालणार नाही कारण शेवटी जुने ते सोने म्हंटले आहेच.
विवाह संस्था टिकून राहणे ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि विवाह जुळवण्यासाठी सामाजिक घटक म्हणून प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत .
ज्योतिषीय दृष्टीकोन त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्था , वधू आणि वराचे आधुनिक विचार , तडजोड , एकत्र कुटुंब अवस्था की विभक्त ह्या सर्वच गोष्टींचा उहापोह पुढील काही लेखांतून करूया आणि ह्यातील अनेक मुद्दे तपासून आणि अभ्यासाची दिशाही ठरवूया .
संपर्क : 8104639230