अवकाळी पावसाच्या तडाख्याने ४ एकरवरील टरबूज सडले; नुकसानीने शेतकऱ्याचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:52 IST2025-06-02T17:51:19+5:302025-06-02T17:52:05+5:30
टरबूज लागवड ते काढणीला येईपर्यंत लावलेले अडीज लाख रुपय पाण्यात गेले

अवकाळी पावसाच्या तडाख्याने ४ एकरवरील टरबूज सडले; नुकसानीने शेतकऱ्याचे स्वप्न भंगले
- मधुकर सिरसट
केज : तालुक्यातील ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील सोनेसांगवी येथील शेतकऱ्याने पावणे चार एकर जमिनीवर अडीच लाख रुपये खर्च करून टरबूजाचे पीक जोपासले होते. शेतकऱ्याने जीवलावून मशागत केल्यामुळे 1 ते 5 किलोपर्यंत टरबूज पोसले होते. ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच 15 ते 20 दिवस अवकाळी पावसाने झड लावल्यामुळे सर्व टरबूज जागेवर सडल्याने जवळपास १० लाख रुपयांची हानी झाली आहे.
सोनेसांगवी येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी आपल्या पावणे चार एकर जमिनीवर मार्च महिन्यात 50 हजार रुपये खर्च करून टरबूज पिकाची 21 हजार रोपांची लागवड केली. त्यानंतर खतांसाठी 60 हजार रुपये, एक लाख रुपयांची किटकनाशक फवारणी केली. वेलीला 1 ते 5 किलो वजनाचे टरबूज पोसले होते. मे महिन्यात पहिली तोडणी करून विक्री करण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दररोज ढगाळ वातावरण आणि पावसाची झड 15 ते 20 दिवस राहिल्याने टरबूज वेलीपासून आपोआपच तुटून बाजूला होत जागेवरच सडले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नाही. उलट लागवड, खत, फवारणीचा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून 10 लाख रुपयांची हानी झाली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी तहसीलदार यांचेकडे केली आहे.
नुकसानीचा पंचनामा
या नुकसानीची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सागर पटाडे यांचे मार्गदर्शना खाली कृषी सहाय्यक योगेश लामतुरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी राजाभाऊ कणसे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला आहे. यात त्यांच्या टरबूज पिकाची 100 टक्के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
मुलाला कृषी दुकान टाकण्याचे स्वप्न भंगले
चांगले उत्पन्न मिळेल म्हणून अडीच लाख रुपये खर्च करून पावणे चार एकर जमिनीवर टरबूजाचे पीक घेतले होते. ऐन तोडणीच्या वेळी अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. टरबूजाच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे ? असा प्रश्न समोर असल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी व्यक्त केली.